पराग अस्वस्थ होऊन हॉलमध्येच येरझारा घालत होता. त्याची नजर वारंवार घड्याळाकडे जात होती. तेवढ्यात दाराची बेल वाजली आणि त्यानं अधीरतेने दार उघडलं. अपेक्षित व्यक्ती समोर दिसल्यावर त्याला थोडं हायसं वाटलं.
“ आत्या, अगं किती उशीर लावलास. मी केव्हाची तुझी वाट बघतोय.”
“अरे हो, पण ऑफिसमधून निघून घरी पोहोचायला मला तेवढा वेळ लागणारच. पण एवढ्या तातडीने मला का बोलावलंस? ”
“ अगं तसंच महत्वाचं काम आहे, म्हणून बोलावलंय. बाबांचं डोकं फिरलंय, ते कुणाचंच ऐकायला तयार नाहीत, पण तुझं ते नक्की ऐकतील म्हणून तुला बोलावलं.”
“ दादाला काय झालंय? काल तर तो माझ्याशी फोनवर चांगलं बोलत होता.”
“त्यांना या वयात म्हातारचळ लागलाय, त्या माधुरीताईंसोबत ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये त्यांना राहायचंय. तू सांग शोभतं का या वयात हे? काल मी ताईलाही फोन केला होता. ती सुद्धा टेन्शनमध्ये आहे. तूच सांग, ताईच्या सासरकडची मंडळी काय म्हणतील?, माझ्या सासुरवाडीला मी काय उत्तर देणार? उद्या माझा पिंटू मोठा होईल–आबा कुणासोबत राहतात?, हे विचारलं, तर मी काय सांगू? माझी मित्रमंडळी काय म्हणतील? आत्या, अगं हे सगळं मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला, पण ते त्यांच्या निर्णयावर ठाम आहेत आता तूच त्यांना समजावून सांग की, हे असलं काहीतरी करून आमची बदनामी करू नका. ते तुझं नक्की ऐकतील.”
“ पराग, हा काय म्हणेल, तो काय म्हणेल, हे मला सांगू नकोस, तुझं काय म्हणणं आहे, ते सांग.”
“आत्या, अगं त्यांचं हे वागणं मला अजिबात पटणार नाही. या वयात असं एखाद्या बाईबरोबर राहणं योग्य आहे का? आणि आम्ही त्यांची काळजी घेतोय ना?”

हेही वाचा : वैध लग्नाकरता कन्यादान नाही, तर सप्तपदी महत्त्वाची !

“आम्ही म्हणजे कोण रे?, तू आणि तुझी बायको नोकरी करता, पिंटूला तुझी सासू सांभाळते, कारण तुझ्या बायकोला मुलगा तिथं राहणं जास्त ‘सेफ’ वाटतं. प्राजक्ता तिच्या संसारात आणि बाहेरगावी आहे. कोण पाहणार त्यांचं? शनिवार रविवारी सुट्टीच्या दिवशीही तुमचे मित्र-मैत्रिणी, गेट टुगेदर चालू असतात, तेव्हा ते एकटेच घरी असतात ना.”
“आत्या, ते एकटे घरी असले तरी त्यांची पूर्ण व्यवस्था आम्ही करूनच जातो. स्वयंपाकाच्या मावशी सकाळ-संध्याकाळ येतात. त्यांची औषधं मेडिकलवाला घरी आणून देतो. त्यांची आम्ही सर्व काळजी घेतो.”

“ते सर्व ठीक आहे, पण त्यांच्या मानसिक गरजांचं काय? त्यांची सुख दुःख जाणून घ्यायला कुणाला वेळ आहे?भरभरून बोलावं असं वाटलं तर ते कुणाजवळ बोलणार? अगदी कधी रडावंसं वाटलं, आपलं दुःख सांगावंसं वाटलं तर कुणाजवळ व्यक्त होणार? वहिनी जाऊन तीन वर्षं झाली. तेव्हापासून तो एकटा पडला आहे. प्रत्येक ठिकाणी दोघं सोबत असायचे, पण कोणतंही आजारपण नसताना ती अचानक हृदयविकारानं गेली. तेव्हापासून दादा एकटा पडलाय. एक वर्ष तो कुणाशीच बोलत नव्हता. त्याला मी ‘आनंदयात्री ग्रुप’मध्ये घेऊन गेल्यावर तो हळूहळू वहिनीच्या दुःखातून बाहेर येऊ लागला. समवयस्क मित्र मैत्रिणीत रमू लागला. माधवरावांच्या अपघाती निधनानंतर माधुरीताईंनी एकटीनं मुलीला वाढवलं, तिचं लग्न करून दिलं. त्याही आता एकट्याच आहेत. दादाचे आणि त्यांचे विचार जुळतात. दोघेही एकमेकांच्या सहवासात आनंदी असतात, मग दोघांनी एकत्र येऊन ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहण्याचं ठरवलं तर बिघडलं कुठं? त्यांच्या आयुष्याची संध्याकाळ चांगली जाणार असेल तर आपणही आपल्या विचारांची प्रगल्भता दाखवायला हवी.”
“म्हणजे तुला हे सगळं माहिती होतं. तू आमच्याशी आधी काहीच का बोलली नाहीस?”

हेही वाचा : किरण रावने पहिल्यांदाच सांगितली आमिर खानसह घटस्फोट घेतानाची मनस्थिती; म्हणाली, “लग्नसंस्थेचे नियम..”

“ पराग, या सर्व गोष्टी दादाच तुम्हांला सांगणार होता. त्यानं पूर्ण विचार करून हा निर्णय घेतला आहे, ते दोघंही वेगळ्या स्वतंत्र घरात राहणार आहेत. त्यांचा तुम्हा मुलांना कोणताही त्रास होणार नाही आणि बाकी लोक काय म्हणतात, याचा आपण विचार करायचा नाही, लोक बोलण्यासाठीच असतात. वेळेला कुणीही येत नाही. तुम्ही मुलांनीही तुमच्या विचारांची प्रगल्भता दाखवा. उतारवयात सहवासाची गरज अधिक असते. शारीरिक आकर्षणाचा मुद्दा इथं नसतोच. एकमेकांना मानसिक व भावनिक आधार देणं हे अपेक्षित असतं. त्याला ‘म्हातारचळ’ असं नाव देऊ नका. तुम्ही सर्वांनी हे समजुतीनं स्वीकारलं तर त्यांनाही अपराधीपणाची भावना निर्माण होणार नाही. आजच्या संगणकीय विज्ञान युगात आपण आपल्या विचारांमध्येही प्रगती करणं गरजेचं आहे.”

आत्याच्या म्हणण्यावर गांभीर्याने विचार करायचा, असं परागनं ठरवलं आणि ही गोष्ट कशा पद्धतीनं बायकोला आणि ताईला समजावून सांगायची या विचारात तो मग्न झाला.

(लेखिका कौटुंबिक न्यायालयात समुपदेशक आहेत.)

(smita joshi606@gmail.com)