डॉ. शारदा महांडुळे

तीळ म्हटलं, की मकर संक्रातीच्या तिळगुळाची हमखास आठवण येते. एकमेकांचे सुख-दुःख जाणून स्नेह वाढावा, यासाठी मकर संक्रांतीला तिळगूळ वाटण्याची प्रथा आहे. तीळ हा स्निग्ध व उष्ण गुणात्मक असतो. त्यामुळे शरीरातील कोरडेपणा कमी होतो. गूळ हा चवीला मधुर, स्निग्ध गुणाचा व रक्त वाढविणारा असतो. म्हणून संक्रांतीला थंडीचा प्रतिकार करण्याची क्षमता शरीरात निर्माण करून आरोग्य जपण्यासाठी तिळगूळ खावा, असे आयुर्वेदात सांगितले आहे. मराठीत ‘तीळ’, संस्कृतमध्ये ‘तिला’, इंग्रजीमध्ये ‘सेसमें’ (sesume), तर शास्त्रीय भाषेत ‘सेसमम इंडिकम’ (Sesumum Indicum) या नावाने ओळखली जाणारी ही वनस्पती ‘पेडालिएसी’ या कुळातील आहे.

भारतामध्ये तिळाची लागवड जास्त प्रमाणात होते. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेशामध्ये तिळाची लागवड केली जाते. तिळाचे रोप साधारणत: दोन हात उंच असते. त्याचे रोप रंगाने हिरवे असते. तिळामध्ये तेलाचे प्रमाण साधारणत: ५०% असते. आयुर्वेदानुसार तीळतेलामध्ये औषधी गुणधर्म जास्त असल्यामुळे पंचकर्म उपचार करण्यासाठी त्याचा वापर केला जातो.

हेही वाचा >>>गणितात सुवर्णपदक मिळवणारी हुषार मुलगी!

औषधी गुणधर्म :

स्निग्धोष्णतिक्तकटुकः कषायमधुरस्तिलः । मेध्यः केश्यो गुरुर्वण्यों स्पर्शशीतोऽनिलापहः । अल्पमूत्र कटुः पाके मेधाग्निकफपित्तकृत् ।

अष्टांग संग्रह सूत्रस्थान ७

आयुर्वेदानुसार : तीळ चवीला तुरट, किंचित कडू, तिखट व मधुर असून, कटुविपाकी व उष्ण आहेत. तसेच ते अत्यंत स्निग्ध असून वातघ्न, पित्तकफकर, बुद्धिवर्धक व केशवर्धक आहेत. गुणधर्म काळे तीळ हे श्रेष्ठ, पांढरे तीळ मध्यम आणि लाल तीळ कनिष्ठ प्रकारचे असतात.

आधुनिक शास्त्रानुसार : तिळामध्ये कॅल्शिअम, लोह व ‘ब’ जीवनसत्त्व विपुल प्रमाणात असते. पांढऱ्या तिळात कॅल्शिअम भरपूर प्रमाणात असते. म्हणून कॅल्शिअम कमतरतेवर पांढरे तीळ खावेत.

तांबड्या तिळात लोह अधिक प्रमाणात असते. म्हणून लोह कमी असणाऱ्यांनी तांबडे तीळ खावेत. तीळतेल हे सर्वसामान्य तापमानाला थिजत नाही, म्हणून ते आरोग्यास हितकारक आहे.

हेही वाचा >>>‘ग्रीनहाऊस’च्या परिणामांवर प्रथम संशोधन कोणी केले ? डॉ. युनिस फूट कोण होत्या ?

उपयोग :

१) तीळतेल स्निग्ध गुणाचे असल्याने तीळ खाल्ल्याने त्वचा मऊ व स्निग्ध होते.

२) ज्यांचे केस रूक्ष व गळत आहेत, त्यांनी तीळ खावेत. यामध्ये कॅल्शिअमचे प्रमाण भरपूर असल्याने केसगळती थांबून केस मजबूत व लांब होतात. तसेच तिळाच्या स्निग्ध गुणामुळे केस मऊ व मुलायम होतात.

३) सकाळच्या वेळी प्रत्येकाने मूठभर तीळ चावून चावून खावेत. यामुळे शरीरास व मनास ऊर्जा मिळून उत्साह निर्माण होतो. तसेच दात मजबूत होतात.

४) तिळाचे तेल अन्य खाद्यतेलांपेक्षा अधिक गुणकारी आहे. ते पौष्टिक, अग्निप्रदीपक, रक्तपित्तनाशक, केशवर्धक, कानदुखी व योनिशूल थांबविणारे, डोळ्यांसाठी हितकारक, गर्भाशयाचे आजार कमी करणारे, उष्ण वीर्यात्मक, वातविकारांवर उपयुक्त, त्वचा कांतियुक्त करणारे असल्यामुळे आहारात त्याचा नियमित उपयोग करावा.

५) ज्या स्त्रियांना मासिक स्राव कमी होतो. त्यांनी १० ग्रॅम काळे तीळ, ग्लासभर पाण्यात उकळून त्याचा काढा तयार करावा व त्यात थोडासा गूळ घालावा. हा काढा मासिक पाळीमध्ये सकाळ- संध्याकाळ एक-एक कप प्यायल्यास मासिक स्राव व्यवस्थित होतो.

६) तिळाची पाने वाटून केसांच्या मुळाशी लावल्यास केसांमधील कोंडा कमी होतो. तसेच केस मुलायम व मजबूत होतात. हीच पाने उकळून ते पाणी केस धुताना वापरल्यास केस चमकदार व मुलायम होऊन अकाली पिकायचे थांबतात.

हेही वाचा >>>झोपू आनंदे : गुंतता हृदय हे!

७) दोन चमचे तीळ पाण्यासोबत वाटून लोण्यासोबत किंवा साजूक तुपासोबत खाल्ल्यास मूळव्याधीचा त्रास कमी होतो.

८) शरीरावरील जखम कोरडी होत नसेल, तर त्या जखमेवर तिळाचे पोटीस बांधावे. यामुळे जखम स्वच्छ होऊन त्वचा कोरडी होते.

९) कान ठणकत असेल, तर तिळाच्या तेलात लसणाची पाकळी घालून ते कडकडीत गरम करावे व नंतर थोडे कोमट झाल्यावर त्याचे थेंब कानात टाकल्यास ठणका कमी होतो.

१०) सांधे दुखत असतील, तर तिळाचे तेल कोमट करून त्याने सर्व अंगाला मालीश करावे. याने सांधेदुखी नक्कीच कमी होते.

११) त्वचा रूक्ष होऊन काळवंडली असेल, तर अशा वेळी तिळाचे तेल कोमट करून त्याने शरीराला मालीश करावे. यामुळे शरीरातील मेद कमी होऊन त्वचा सुंदर व मऊ बनते.

१२) दात कमकुवत होऊन हलत असतील व त्याचबरोबर हिरड्यांमधून रक्त येत असेल, तर अशा वेळी कोमट तिळाच्या तेलाची गुळणी तोंडात धरून ठेवावी. यामुळे हलणारे दात मजबूत होतात.

१२) आहारामध्ये भाकरी, केक, बिस्किटे यांवर तीळ लावून नियमित खाल्ल्यास आरोग्य प्राप्त होते. तसेच तिळापासून तिळगूळ किंवा चिक्की बनवून त्याचा नियमित वापर करावा. यामुळे शरीरातील रक्ताचे व कॅल्शिअमचे प्रमाण वाढून आरोग्य सुधारते.

सावधानता : तीळ हे उष्ण गुणात्मक असल्याने व पित्तप्रकोपक असल्याने त्याचा आहारामध्ये वापर वसंत, ग्रीष्म व शरद ऋतूमध्ये सहसा करू नये.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

dr.sharda.mahandule@gmail.com