पहिल्या दिवाळीनिमित्त माहेरी आलेली रीमा जुन्या मैत्रिणींना भेटून कसली हरखून गेली होती. अख्खं एक वर्ष तिच्या दोन्ही लाडक्या मैत्रिणी तिला भेटल्या नव्हत्या. एक तिथेच नोकरी करणारी, तर एक विवाहित मैत्रीण माहेरी आली म्हणून भेटली. गेल्या वर्षभरात अनेकदा ठरवूनही अनेक सांसारिक कारणांनी त्यांच्या भेटीचा योग चुकत गेला होता. बहुतेक मुलींना लग्नानंतर आपल्या जीवाभावाच्या मैत्रिणींना पूर्वीसारखं भेटणं तसं दुर्मीळच! सारिकाचंही अतुलशी लग्न ठरलं होतं. अतुल तिला उत्साहात म्हणाला, “सारिका, आपल्या लग्नानंतर आमच्या इकडे मोठं रिसेप्शन ठरलं आहे ना, त्याला तुझी सगळी गँग तिथे बोलाव बरं का!”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : ती पुन्हा भेटली… पण या खेपेस वेगळ्या रूपात!

“सगळी गँग म्हणजे मुली आणि मुलगेही चालतील? बघ हं, माझा मित्रपरिवार बराच मोठा आहे. ”
“ हो गं… मुलगेसुद्धा चालतील बरं! आम्ही सगळे नवीन विचारांचे आहोत. माझ्या ताईलाही अनेक मित्र मैत्रिणी आहेत… म्हणजे होते. आता तिच्या लग्नानंतर तो ग्रुप नाही टिकून राहिला.” अतुल खेदानं म्हणाला.
“पण तिच्या ग्रुपमधील बरीच मंडळी तर याच शहरात आहेत ना? तरीही ग्रुप नाही राहिला? आणि तुझ्या जिजाजींचं काय? त्यांचे बरेच मित्र टिकून असतील ना अजून?”
“ हो, आहेत की. त्यांचा चार जणांचा ग्रुप खूप सॉलिड आहे. नेहमी भेटतात, ट्रीपला जातात. भारी आहेत सगळे.” इति अतुल.

आणखी वाचा : ‘ती’ दिवाळी पहाट

“ किती कमाल आहे ना अतुल, पुरुषांचा मित्रपरिवार लग्नानंतरही सहज टिकतो, पण ताईसारख्या मुलींचा मात्र टिकतोच असं नाही. किती वाईट ना? खरं तर मैत्रीची गरज स्त्री पुरुष दोघांनाही असते. लग्नानंतर मुलग्यांना म्हणजे पुरुषांना मैत्री टिकवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत, पण मुलींना मात्र तितकंसं सोपं जात नाही. असं का रे? ”
“तुझे मित्र मैत्रिणी येऊ देत गं घरी. मला काहीच अडचण नाही. आई बाबांनाही नसेल. डोन्ट वरी.” अतुलनं तिची समजूत काढली, पण सारिका मात्र त्या विचाराने अस्वस्थ झाली होती. खरंच लग्नानंतर आपण आपल्या कंपूत पूर्वीसारखे मिसळू शकू का? इतकी वर्षं ज्यांच्यासोबत घालवली, एकत्र मस्ती, अभ्यास, एकत्र फिरायला जाणं. हे सगळं एका शहरात असूनही जमवणं कठीणच जातं. शालेय वयातील मैत्रिणींसोबत असतं ते नातं नंतर वाढत्या वयातील कॉलेज किंवा ऑफिसमध्ये तितकंसं घट्ट नाही राहू शकत. त्या मैत्रीच्या नात्याला व्यावसायिकतेचा गंध असतो. त्यांच्याजवळ आपलं खाजगी आयुष्य आणि मन उघड करता येत नाही… तो अधिकार आपल्या जुन्या मित्रमंडळींचा! जवळची मैत्रीण म्हणजे हक्काचं लॉकर! तिथे अनेक गुपितं सुरक्षित ठेवलेली असतात, अनेक समस्यांवरचं निदान असतं. केवळ लग्न झालं म्हणून ते लॉकर आपल्यासाठी बंद व्हायला नको ना?

आणखी वाचा : Ind vs Pak: प्रिय अनुष्का, थँक ‘यू’!

जुन्या मित्र मंडळींना लग्नानंतर आपल्या जोडीदारालाही त्या कंपूत समाविष्ट करण्याची इच्छा असते. तसं होऊ शकलं तर उत्तमच, पण सहसा ते तितकंसं सोपं जातं नाही. बायकोच्या मित्र मंडळीत तो नव्याने आलेला नवरा किंवा एखाद्याच्या बायकोला अवघडल्यासारखं होतं, तसं होणं अगदीच स्वाभाविकही आहे. यासाठी पती पत्नींनी एकमेकांची अडचण समजावून घेत तितकी मोकळीक देणं आवश्यक आहे. पुढे मुलं होतात, त्यांचं संगोपन, ज्येष्ठ मंडळींची जबाबदारी, इतर सासरचे नातेवाईक, सणवार यात ती बाई गुरफटते. हे असं पुरुषांच्या बाबतीत होत नाही. एका रात्रीतून ठरवून ती मंडळी हवं तेव्हा हवं तिथे भेटतात. घरी बायको असतेच जबाबदारी सांभाळायला. मैत्री टिकवण्याची गरज फक्त पुरुषांनाच वाटत असते का? नाही ना? मग स्त्रियांनीही थोडं घराबाहेर पडून त्यांच्या जवळच्या जीवाभावाच्या मित्रमंडळींना आपल्या व्यग्र आयुष्यातून आणि अनंत जबाबदाऱ्या सांभाळूनही वेळ काढून भेटायला हवं. अनेकदा आपण बघतो की पुढे मुलं मोठी झाली, जरा निवांतपणा मिळाला की मग स्त्रियांना आपल्या मैत्रिणी आठवतात. त्यावेळी मग सगळ्या भेटतात, पण मध्ये फार मोठा काळ निघून गेला असतो. हेच जरा आधी जमायला हवं.

आणखी वाचा : …अन् त्यांची ‘हॅप्पी दिवाली स्माईल’ कधीच कमी होत नाही!

अनेकदा तर सासरची मंडळी समजून घेतात, पण मुली आपल्या संसारात खूप गुरफटून जातात आणि मैत्री मागे पडते. सासरची मंडळी आणि नवरा सांभाळताना हे नातं देखील जपणं आलंच पाहिजे. शेवटी आपलं हक्काचं लॉकर असतं ना ते?
adaparnadeshpande@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Relationship pre marriage and after man and women what needs to be taken care of vp
First published on: 25-10-2022 at 10:35 IST