गर्भधारणा होते, पण टिकत नाही, असं एखाद्या जोडप्याच्या बाबतीत वारंवार का होत असावं? प्रामुख्याने विवाहित स्त्रियांमधील दोषांमुळेच असं होत असावं असा काही वर्षांपर्यंतचा समज होता. अलीकडच्या काळात या संदर्भात झालेल्या प्रचंड संशोधनात्मक कामानंतर, वीर्यातील शुक्राणूतील दोषामुळे देखील वारंवार गर्भपात होऊ शकतात, असं आढळून आलेलं आहे. हे दोष कोणत्या प्रकारचे असतात, त्यावर उपचार आहेत किंवा नाही याबद्दलची माहिती त्या जोडप्याला आणि नातेवाईकांना असायला हवी.

गर्भधारणा ही पत्नीचं स्त्री-बीज आणि पतीच्या वीर्यातील शुक्राणूंच्या मिलनानंतर होणारी एक नैसर्गिक घटना. आजकाल हा संयोग प्रयोगशाळेत देखील घडवून आणला जाऊ शकतो. गर्भधारणा नैसर्गिकरित्या राहिलेली असो वा प्रयोगशाळेतील तंत्रज्ञानाच्या मदतीने; ती राहते, पण टिकत नाही, असं एखाद्या जोडप्याच्या बाबतीत वारंवार होतं. सलग २ किंवा ३ वेळा २० आठवड्यापर्यंत असा गर्भपात झाल्यास, वारंवार गर्भपात होणं असं म्हणतात (Recurrent Pregnancy Loss). साधारणतः २ टक्के जोडप्यांमध्ये ही समस्या आढळून येते. वारंवार होणाऱ्या गर्भपाताचा काही पॅटर्न आहे का हे अगोदर बघितलं जातं. किती वेळेस गर्भपात झाला आहे, तो गर्भधारणेच्या कोणत्या आठवड्यात झाला आहे, गर्भपात पुन्हा-पुन्हा त्याच आठवड्यात होतोय का प्रत्येक वेळेस वेगळ्या आठवड्यात होत आहे का, या सगळ्या बाबींचा विचार निदान आणि उपचाराच्या दृष्टीने महत्वाचा असतो. पहिल्या तीन महिन्यात वारंवार होणारे गर्भपात आणि नंतरच्या तीन महिन्यात वारंवार होणारे गर्भपात, याची कारणं वेगवेगळी असतात.

आणखी वाचा-Iltija Mufti : आईच्या जागेवरून आता लेक उभी राहणार; परदेशातील भारतीय संस्थांचा अनुभव असलेल्या इल्तिजा राखणार का मेहबुबा मुफ्ती यांचा गड?

दोन सलग गर्भपातानंतर, असं का होत आहे याबद्दलच्या तपासण्या केल्या जातात. बहुतेक सर्व तपासण्या स्त्रियांच्या केल्या जातात. त्यात प्रामुख्याने त्या स्त्रीला थायरॉइडची किंवा मधुमेहाची समस्या आहे किंवा नाही हे पाहिलं जातं.

सूक्ष्मरक्तवाहिन्यांमध्ये रक्त गोठण्याची समस्या (thromboembolic phenomenon ), शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीच्या संदर्भात Anti Phospholipid Antibody ची समस्या आहे का या संदर्भातील रक्त तपासण्या केल्या जातात. वारंवार गर्भपात होण्यामागच्या कारणांमध्ये रोगजंतूंचा प्रादुर्भाव ( इन्फेक्शन) चा देखील समावेश आहे. गर्भाशयाच्या आकारमानात जन्मदोष असल्यास सहसा, १२ ते २० आठवड्यापर्यंतचे गर्भपात होतात. तो दोष आहे की नाही हे तपासून पाहण्यासाठी गर्भाशयाचा एक खास एक्स रे काढावा लागतो. या तपासण्या केल्यानंतर देखील जेंव्हा कारण समजत नाही, तेंव्हा जनुकीय तपासणी करून पहावी लागते.

स्त्रियांच्या संदर्भात वारंवार गर्भपात होण्याची जी कारणं सांगितली जातात ती अधिक स्पष्ट आहेत. पुरुषांच्याबाबतीतली ती कारणं त्यामानाने स्पष्ट झालेली नाहीत हे खरं आहे. पण अलीकडच्या काळात या आघाडीवर जे संशोधनात्मक काम झालं आहे त्यात वीर्यातील शुक्राणूंचा अभ्यास झाला आहे. फलधारणा (fertilization) होत असताना एक पेशी रूपात असलेल्या स्त्री-बीजातील केंद्रबिंदूतील ५० टक्के गुणसूत्रांचा आणि एक पेशी रूपात असलेल्या शुक्राणूंच्या केंद्रबिदूतील ५० टक्के गुणसूत्रांचा संयोग होत असतो. याचा अर्थ असा की, गर्भाचा ‘जिनोम’ तयार होणं, गर्भ ९ महिने वाढणं किंवा गर्भपात होणं या दोन्ही ‘कार्यात’ ५० टक्के सहभाग हा शुक्राणूंचा असायला पाहिजे ही तर्कसुसंगत बाब आहे. शुक्राणूंच्या आघाडीवर इतकी वर्षं म्हणावं तसं संशोधनात्मक कार्य झालेलं नाही.

आणखी वाचा-निसर्गलिपी: हिरवा निसर्ग हा भवतीने…

वंधत्व निवारणाच्या आघाडीवर किंवा ‘टेस्ट ट्यूब’ संदर्भात नवीन तंत्रज्ञान झपाट्याने विकसित होत असताना शुक्राणूंच्या बाबतीत खोलवर अभ्यास झाला. मूल होत नाही या समस्येसाठी पूर्वी शुक्राणूंची संख्या लक्षात घेतली जात असे. आता शुक्राणूंचा सविस्तर अभ्यास करून त्यातील दोष असलेले शुक्राणू वेगळे करून चांगल्या क्षमतेचे शुक्राणू गर्भधारणा यशस्वी व्हावी यासाठी निवडून फलधारणेसाठी प्रयोगशाळेत वापरले जातात. जनुकीय स्तरावरच्या मूलभूत तपासण्या उदा. पती-पत्नीच्या गुणसूत्रांची (Karyotyping) असो वा शुक्राणूंच्या केंद्रबिंदूत उपलब्ध असलेल्या जनुकांमधील निसर्गतःच असलेल्या रचनेतील दोषाचा शोध घेणारी खास तपासणी असो; या प्रयोगशाळा फक्त दिल्ली, मुंबई, पुणे, हैद्राबाद वगैरे सारख्या मोठ्या शहरातच उपलब्ध आहेत. त्यासाठी खूप जास्त फी मोजावी लागते. त्या तपासणीचे रिपोर्ट येण्यासाठी देखील एक-दोन आठवड्याचा कालावधी लागतो. तपासण्या केल्यानंतर ज्या स्त्रियांमध्ये निदान होतं, त्यांच्यावर ठराविक उपचार केल्यानंतर यश मिळतं. पण विविध तपासण्या करून देखील जेंव्हा त्याचे नक्की कारण सांगता येत नाही तेंव्हा कधी टेस्ट-ट्यूब बेबीचा प्रयोग करावा लागतो.

वीर्यातील शुक्राणूतील दोषांमुळे देखील वारंवार गर्भपात होऊ शकतात हे अलीकडच्या काळातील संशोधनात स्पष्ट झालेलं आहे. त्या शुक्राणूंची फलधारणा घडवून आणण्याची ‘शक्ती’ गोळ्या-औषधाने वाढवता येते. तसं न झाल्यास निकृष्ट दर्जाचे शुक्राणू निवडून बाजूला काढून IUI किंवा IVF तंत्रज्ञानाने फलधारणा घडवून आणता येते. अत्याधुनिक तपासण्याचा आधार घेऊन देखील साधारणतः ३३ टक्के जोडप्यांमध्ये वारंवार गर्भपात का होत आहेत हे सांगता येत नाही. ज्या जोडप्यांमध्ये खात्रीपूर्वक निदान होत नाही त्यांच्यावर अनुभवाच्या आधारवर, मानसिक आधार देऊन केले जाणाऱ्या उपचारांना देखील यश मिळतं.

( लेखक एम. डी. (स्त्रीरोग आणि प्रसूतिशास्त्र) तसेच पीएच.डी. (समाजशास्त्र) आणि एमएस (काउन्सेलिंग आणि सायकोथेरपी) आहेत.)

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

atnurkarkishore@gmail.com