भाजपला रोखण्यासाठी प्रयत्न मुंबई महापालिकेच्या सत्तेपासून भाजपला रोखायला हवे, यावर काँग्रेसमध्ये एकमत असले तरी जाहीर पाठिंबा देण्यास दिल्लीने नकार दर्शवला आहे. तटस्थ राहून मदत करायची की निधर्मवादी गटांचा उमेदवार उभा करायचा या पर्यायांवर काँग्रेसकडून विचारविनिमय सुरू झाला आहे. दरम्यान, शिवसेनेला उघडपणे पाठिंबा दिला जाणार नाही, असे काँग्रेसने स्पष्ट केले आहे. मुंबई महापालिका निवडणुकीत ३१ जागा निवडून आलेल्या काँग्रेसला सत्तेसाठी महत्त्व प्राप्त झाले आहे. काँग्रेसकडून मदत केली जाते का, याची चाचपणी शिवसेनेकडून केली जात आहे. शिवसेनेला उघडपणे मदत केली जाणार नाही, पण शिवसेनेला मदत होईल, अशी भूमिका काँग्रेसकडून घेतली जाऊ शकते, असे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून सूचित करण्यात येत आहे. शिवसेनेला कोणत्याही परिस्थितीत मदत करू नये, अशी मागणी अ. भा. काँग्रेस समितीचे सरचिटणीस गुरुदास कामत यांनी पक्षाचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्याकडे केली आहे. उघडपणे तसेच अप्रत्यक्षपणे मदत करू नये, असेही कामत यांचे म्हणणे आहे. शिवसेनेला मदत करावी, असा पक्षात मतप्रवाह असतानाच, कामत यांनी मात्र विरोधी सूर लावला आहे. महापौरपदाच्या निवडणुकीत काँग्रेसने तटस्थ राहावे म्हणून शिवसेनेचे प्रयत्न सुरू आहेत. महापौरपदाच्या निवडणुकीला अजून वेळ असल्याने दिल्लीत सविस्तर चर्चा करूनच निर्णय घेतला जाईल. भाजपला सत्तेपासून रोखावे, असा काँग्रेसमध्ये मतप्रवाह आहे. या दृष्टीने कोणते उपाय योजता येतील याचे नियोजन करून प्रस्ताव दिल्लीला पाठविला जाईल. शिवसेनेकडे पुरेसे संख्याबळ होईल या दृष्टीने फासे फेकले जाण्याचीही शक्यता आहे. ‘काँग्रेसबरोबर जाण्यास कोणालाही रोखले नाही’ काँग्रेस भ्रष्ट असून त्यांच्याबरोबर विचारांची लढाई असल्याने त्यांच्याशी सत्तेसाठी कोणतीही तडजोड करणार नाही, असे प्रतिपादन करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे नाव न घेता ‘काँग्रेसबरोबर जाण्यास कोणालाही रोखणार नाही, ’ असे स्पष्ट केले. पदे मिळाली नाहीत, तरी पर्वा नाही, पण पारदर्शी कारभाराच्या मुद्दय़ावर कोणतीही तडजोड करणार नसल्याचे फडणवीस यांनी ठणकावले. ‘राज्यातील सरकार पाडायची काँग्रेसची इच्छा’ मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी शिवसेनेला पािठबा देण्यासंदर्भात काँग्रेसच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे. काँग्रेसच्या या खेळीवरून केद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काँग्रेसवर टीका केली आहे. राज्यातील भाजप सरकार पडावे, अशी काँग्रेसची इच्छा आहे. त्यामुळेच काँग्रेसचे काही नेते मुंबई महापालिकेत सत्तास्थापनेसाठी पािठबा देण्याबाबत वक्तव्ये करीत आहेत, असे नितीन गडकरी म्हणाले.