लोकसहभागातून ग्रामविकास व लोक कार्यक्रमांत शासनाचा सहभाग या संकल्पनेवर आधारित असलेली आदर्शगाव संकल्प व प्रकल्प योजना कार्यक्रम हा एक गावाच्या सर्वागीण विकासासाठी असलेला उपक्रम आहे. योजनेचा उद्देश गाभा व बिगरगाभा क्षेत्राचा विकास आणि चराईबंदी, कुऱ्हाडबंदी, नसबंदी, नशाबंदी, निर्मलग्राम, (लोटाबंदी) बोअरवेल बंदी व श्रमदान या सप्तसूत्रीचे पालन गावाने व ग्रामसभेने निवडलेल्या स्वयंसेवी संस्थेच्या माध्यमातून करणे हा योजनेचा उद्देश आहे. गावनिवडीचे निकष गावाच्या एकूण क्षेत्रापैकी सर्व प्रकारे मिळून ३० टक्क्यांहून अधिक सिंचन क्षेत्र नसावे. गावाची लोकसंख्या ४,००० च्या आत असावी. गावाचे महसुली क्षेत्र १,५०० हेक्टपर्यंत असावे. गट ग्रामपंचायतीअंतर्गत स्वतंत्र वाडी/ वस्तीस सहभागी होता येते. ग्रामविकास निधी उभारून तो चालविण्यासाठी ग्रामस्थांची तयारी असणे आवश्यक आहे. सप्तसूत्रीचे पालन करण्याची ग्रामस्थांची तयारी हवी. विविध ग्राम अभियानांत (उदा. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता, निर्मलग्राम, तंटामुक्ती आदी.) पुरस्कारप्राप्त गावे. संस्थानिवडीचे निकष गावातील संस्थेला प्रथम प्राधान्य देण्यात यावे. गावात संस्था नसेल, तर त्या तालुक्यातील २५ किलोमीटरच्या आतील गावातील जवळच्या संस्थेला प्राधान्य देण्यात यावे. ही संस्था शक्यतो जिल्ह्य़ातील असावी. या संस्थेची नोंदणी धर्मादाय आयुक्तांकडे केलेली असावी. संस्थेची वार्षिक उलाढाल रु. ३ लाखांपेक्षा कमी असू नये. संस्थेचा तीन वर्षांचा लेखापरीक्षण अहवाल सादर करणे आवश्यक. संस्था फॅमिली ट्रस्ट नसावी. तसेच घटना सादर करणे आवश्यक. योजनेसाठी संपर्क- सर्व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालय व राज्य पातळीवरील आदर्शगाव व प्रकल्प योजना कार्यालय, कृषिभवन, शिवाजीनगर, पुणे.