भारतरत्न उस्ताद बिस्मिल्लाह खान यांच्या पाच सनई चोरीला गेल्या आहेत. या पाचही सनई चांदीच्या आहेत. उस्ताद बिस्मिल्लाह खान यांचे पुत्र काजिम हुसैन यांच्या वाराणसी येथील चाहमामा-दालमंडीमधील घरातून सनई चोरीला गेल्या आहेत. मोहरमच्या पाचव्या आणि सातव्या दिवशी उस्ताद बिस्मिल्ला खां यांच्याकडून वाजवल्या जाणाऱ्या सनईचादेखील चोरी झालेल्या पाच सनईंमध्ये समावेश आहे. याशिवाय पुरस्कार स्वरुपात मिळालेली चांदीची तबके आणि लाखो रुपयांचे दागिनेदेखील चोराने लंपास केले आहेत. बिस्मिल्लाह खान यांचे पुत्र काजिम हुसैन यांनी या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यावेळी काजिम यांना अश्रू अनावर झाले होते. 'चोरीला गेलेल्या सनई आणि इतर वस्तू उस्ताद बिस्मिल्लाह खान यांच्या आठवणींचा खजिना होता. त्या वस्तू म्हणजे उस्ताद बिस्मिल्लाह खान यांचा अमूल्य वारसा होता,' असे काजिम यांनी म्हटले आहे. काजिम यांनी नुकताच दालमंडीमधील चाहमामामध्या नवे घर घेतले होते. या घरातील एका कपाटात उस्ताद यांच्या सर्व वस्तू ठेवण्यात आल्या होत्या. 'पाच दिवसांआधी म्हणजेच ३० नोव्हेंबरला आम्ही सहकुटुंब हडहा सरायमधील आमच्या जुन्या घरी गेलो होतो. शनिवारी रात्री ९ च्या सुमारास आम्ही घरी परतलो, त्यावेळी घराचे कुलूप फोडलेले दिसले. घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पसरले होते. चोरांनी कपाटात ठेवलेली चांदीची सनई, घरातील महिलांचे दागिने आणि लाखो रुपयांची रोकड घेऊन पोबारा केला होता. आम्ही या घटनेची माहिती समाजवादी पक्षाचे आमदार शतरुद्र प्रकाश यांना दिली. यानंतर आम्ही पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार नोंदवली. सध्या या प्रकरणी पोलिसांचा तपास सुरू आहे,' अशी माहिती काजिम यांनी दिली आहे. 'चोरांनी उस्ताद बिस्मिल्लाह खां यांची खास सनईदेखील लांबवली. ही सनई उस्ताद फक्त मोहरमच्या पाचव्या आणि सातव्या दिवशी वापरायचे. याशिवाय माजी पंतप्रधान पी. व्ही. नरसिंह राव, माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल, लालूप्रसाद यादव, उस्ताद यांचे शिष्य भार्गव शर्मा यांनी उस्ताद बिस्मिल्लाह खान यांना एक-एक सनई भेट म्हणून दिली होती,' असे काजिम यांनी सांगितले.