'जन गण मन' या राष्ट्रगीताप्रमाणे 'वंदे मातरम' हे राष्ट्रीय गाणे म्हणताना विशिष्ट संकेत पाळण्याचे आदेश देऊ शकत नाही, असे दिल्ली उच्च न्यायालयाने आज स्पष्ट केले. यासंदर्भात दाखल करण्यात आलेली याचिका फेटाळताना न्यायालयाने हे विधान केले आहे. दिल्लीचे रहिवासी असलेल्या गौतम मोररका यांनी 'वंदे मातरम' या राष्ट्रीय गाण्याला 'जन गण मन' प्रमाणेच सन्मान आणि आदर दिला जावा, अशी मागणी केली होती. यासाठी त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल केली होती. ही याचिका न्यायालयाने आज फेटाळून लावली. 'याचिकाकर्त्याची भूमिका आम्हाला मान्य आहे. वंदे मातरमची जनमानसांत खास जागा असली, तरी त्या गीताला राष्ट्रगीताचा दर्जा देता येणार नाही,' असे न्यायालयाने म्हटले आहे. याचिकाकर्त्यांने आपल्या याचिकेत वंदे मातरमला राष्ट्रगीताप्रमाणे दर्जा देण्यासाठी 1971 National Honour Act मध्ये बदल करण्यात यावा अशी सूचनाही केली होती. मद्रास उच्च न्यायालयाने जुलै महिन्यांत आदेश देताना सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये आठवड्यातून एक दिवस 'वंदे मातरम' म्हणणे अनिवार्य असल्याचा आदेश दिला होता. तसेच सर्व सरकारी कार्यालयांमध्ये देखील महिन्यांतून एकदा 'वंदे मातरम' गायले जावे असेही न्यायालयाने म्हटले होते. न्यायालयाच्या या आदेशानंतर देशभरात बरेच वादळ उठले होते.