चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झालेला २५ वर्षाचा अकबर अली रस्त्यावर विव्हळत होता.तो रस्त्यावरुन जाणाऱ्यांकडे पाणी मागत होता.पण त्याला मदत करण्याऐवजी लोक त्याचा व्हिडिओ आणि फोटो काढत होते. माणुसकीला काळिमा फासणारी ही घटना दिल्लीत घडली. मंगळवारी दिल्लीतील विष्णू गार्डन येथे अकबर अली या २५ वर्षाच्या तरुणावर चार जणांनी चाकू हल्ला केला. दोन चाकू त्याच्या शरीरात खुपसले होते. हल्ल्यात गंभीर झालेला अकबर अली रस्त्यावर वेदनेने विव्हळत होता. रस्त्यावरुन जाणाऱ्यांकडे तो मदत मागत होता. मला थोडं पाणी हवंय असा इशारा तो करत होता. पण लोकांनी त्याला मदत करण्याऐवजी त्याचे फोटो आणि व्हिडिओ काढण्यात धन्यता मानली. या घटनेचे व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर हा प्रकार समोर आला. अकबर अलीला स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र बुधवारी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. अकबर अलीच्या भावाने या घटनेवर प्रतिक्रिया दिली. 'माझा भाऊ मदत मागत होता. पण कोणीही मदतीसाठी पुढे आले नाही. बुधवारी दुपारी रुग्णालयात त्याला जीव गमवावा लागला, असे सांगताना त्याला अश्रू आवरत नव्हते. दरम्यान, अकबर अलीवर हल्ला करणाऱ्या चार पैकी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. अकबर अली हा गुंड प्रवृत्तीचा होता आणि त्याने आमच्याकडे खंडणी मागितली होती. आम्ही पैसे देण्यास नकार दिल्याने वाद झाला आणि या वादातून अकबर अलीवर वार केले असा दावा आरोपींनी केला आहे. तर पोलिसांनी अद्याप या वृत्ताला दुजोरा दिलेला नाही. आम्ही अकबर अलीचा रेकॉर्ड तपासायला सुरुवात केली आहे. तूर्तास याविषयी ठोस माहिती मिळू शकलेली नाही असे पोलिसांनी सांगितले. एका महिलेने अकबर अलीला रुग्णालयात दाखल करण्याचे धाडस दाखवले अशी माहिती समोर येत आहे. या महिलेविषयी अद्याप कोणतीही मिळू शकलेली नाही.