सध्या देशात गाढवावरून वक्तव्य करण्याची लाट आल्याचे दिसत आहे. उत्तर प्रदेशमधून सुरू झालेला हा प्रकार आता गुजरातमध्ये पोहोचला आहे. पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेलने गुजरात विधानसभेत असलेल्या ४४ पाटीदार आमदारांना गाढवाची उपमा देऊन नवा वाद निर्माण केला आहे. हार्दिक पटेल इतक्यावरच थांबला नाही. तो म्हणाला, भाजपच्या सांगण्यावरून मला साथ न देणाऱ्यांच्या डीएनएमध्येच काहीतरी कमतरता असल्याचे तो म्हणाला. गुरूवारी सुरत गुन्ह शाखेसमोर हजेरी लावल्यानंतर आयोजित एका सभेत तो बोलत होता. आपल्या सभेत त्याने अनेक वादग्रस्त विधाने केली. मला लोक नेहमी विचारतात की, एवढ्या मोठ्या आंदोलनामुळे तुम्हाला काय मिळाले. तर मी त्यांना सांगतो की, या आंदोलनामुळे मला ४४ पाटीदार गाढव आमदार मिळाले, जे १४ पाटीदार युवकांच्या मृत्यूनंतरही गूपचूप बसले. सध्या गाढवावरून उत्तर प्रदेशमधील राजकारण तापले आहे. प्रचारात मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी गुजरातमधील गाढवाच्या जाहिरातीचा आधार घेत अप्रत्यक्षपणे पंतप्रधान मोदी यांच्यावर हल्ला केला होता. गुजरातचे लोक गाढवांचा प्रचार करतात, असे त्यांनी म्हटले होते. अखिलेश यांच्या टीकेवर प्रतिक्रिया देताना मोदी यांनी गाढव हे आपल्या मालकाप्रती प्रामाणिक असतात, असे म्हटले होते. लोक गाढवांची मस्करी करतात. पण गाढवापासून मी प्रेरणा घेतो, असे त्यांनी म्हटले होते. अखिलेश यांनी गाढवावरून वक्तव्य करण्यापूर्वी काँग्रेसने गुजरातमध्ये गाढवांवरून डाक तिकिट जारी केले होते, याची माहिती घ्यावी, असा टोला लगावला होता.