हरियाणा विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाची सुरुवात जैन धर्मगुरु तरुण सागर यांच्या 'तासा'ने झाली. दिगंबर अवस्थेत आलेल्या धर्मगुरु तरुण सागर यांनी धर्म आणि राजकारणापासून ते अगदी पाकिस्तानपर्यंतच्या मुद्द्यांवर भाष्य केले. विशेष म्हणजे धर्मगुरुंच्या आसन व्यवस्थेला मुख्यमंत्री आणि राज्यपालांपेक्षाही वरचे स्थान देण्यात आले होते. हरियाणाचे शिक्षणमंत्री रामविलास शर्मा यांनी जैन धर्मगुरु तरुण सागर यांना विधानसभेत संबोधित करण्यासाठी आमंत्रित केले होते. धर्म आणि राजकारणाविषयी बोलताना सागर म्हणाले, राजकारणावर धर्माचा अंकुश असणे गरजेचे आहे. धर्म हा पतीप्रमाणे असून राजकारण ही पत्नीप्रमाणे असते. ज्याप्रमाणे पत्नीला संरक्षण देण्याची जबाबदारी पतीची आणि पतीच्या अनुशासनाचा स्वीकार करणे ही पत्नीची जबाबदारी असते. त्याचप्रमाणे धर्माचे राजकारणावर नियंत्रण असणे गरजेचे आहे. तसे नसल्यास ते एका बेफाम हत्तीप्रमाणे असेल असे मत त्यांनी मांडले. स्त्री भ्रूणहत्येवरही खंत व्यक्त करतानाच या समस्येवर तरुण सागर यांनी उपाय सुचवला आहे. सरकारने मुली नसलेल्या लोकांना लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवता येणार नाही असा नियम केला पाहिजे असे त्यांनी सांगितले. तर सामाजिक स्तरावर ज्या घरात मुली नाही त्या घरातल्या मुलांना कोणी मुलीच द्यायला नको असे त्यांनी सुचवले. धार्मिक स्तरावर धर्मगुरुंनी ज्या घरात मुली नाही त्या घरात भीक्षा घ्यायला नको असा पर्यायही त्यांनी सुचवला आहे. गुन्हेगारी वृत्तीच्या मंडळींना विधानसभा आणि लोकसभेचे पायरी चढू देऊ नका असे खडे बोलही त्यांनी या आमदारांना सुनावले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कामाचे कौतुक करतानाच सागर यांनी पाकिस्तानवरही टीका केली. दहशतवादाला पाकिस्तानचे पाठबळ आहे. वारंवार चुका करतो तो पाकिस्तान आहे आणि जो नेहमी माफ करतो तो भारत आहे असे सांगत सागर यांनी पाकिस्तानवर निशाणा साधला. तरुण सागर यांचे विधानसभेतील भाषण सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. ट्विटरवर अनेकांनी या कार्यक्रमावर नाराजी व्यक्त केली आहे.