बिहारमधील पराभवाला पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार नसल्याचे सांगत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी इतर भाजप नेत्यांच्या वक्तव्याचीच री ओढली. मोदींसोबतच सरसंघचालक मोहन भागवत यांचाही राजनाथ यांनी बचाव केला. मोहन भागवत यांनी आरक्षणासंदर्भात कोणतेही वादग्रस्त वक्तव्य केलेले नसून त्यांच्या वक्तव्याचा आणि बिहारमधील भाजपच्या पराभवाचा काहीही संबंध नाही, असे राजनाथ यांनी ठासून सांगितले. गरजूंना आरक्षण मिळावे, एवढेच भागवत यांनी सांगितले होते, असे राजनाथ म्हणाले. गोमांसवादामुळे बिहारमध्ये भाजपला फटका बसल्याचे फेटाळून लावताना राजनाथ यांनी भाजप हा सर्वाधिक धर्मनिरपेक्ष पक्ष असल्याचा दावा केला. यासोबतच येत्या काळात उत्तरप्रदेशमध्ये निवडणुका होणार असून त्यात भाजप घवघवीत यश संपादन करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.