काश्मीर खोऱ्यात धगधगणारा हिंसाचार हा आपल्या सर्वांच्या संयुक्त चुकांचे फळ असल्याचे सांगत जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी पंतप्रधानांवर स्तुतीसुमनांची उधळण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी काश्मीर खोऱ्यातील हिंसाचाराच्या मुद्याला 'मन की बात' या कार्यक्रमातून देशासमोर मांडले. यानंतर अब्दुल्ला यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधानांच्या भूमिकेचे स्वागत केले. मागील सोमवारी काश्मीर हिंसाचाराच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी विरोधी पक्षाच्या नेत्यांशी चर्चा केली होती. या बैठकीत मोदींनी काश्मीरमधील हिंसाचारात प्राण गमावलेल्याबद्दल आपलेपणाची भावना व्यक्त करत काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी संवादाची गरज असल्याचे म्हटले होते. या चर्चनंतर पंतप्रधानांनी काश्मीरमधील हिंसाचाराबाबतच्या भावना रेडिओच्या माध्यमातून देशवासिसमोर व्यक्त केल्याच्या भूमिकेचे ओमर यांनी स्वागत केले. काश्मीरमधील हिंसाचारामध्ये सामुहिक चुका झाल्यामुळे तसेच परिस्थिती हताळण्यासाठी योग्य उपाय योजना आखण्यात अपयशी ठरल्यामुळे परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे ओमर यांनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी 'मन की बात' या कार्यक्रमातून देशवासियांना संबोधित करताना काश्मीरमधील हिंसाचारात तरुण असो किंवा जवान या पैकी कोणाचाही बळी गेल्यास संपूर्ण देशाचेच नुकसान होते, असे वक्तव्य केले होते. बुरहान वानीवरील कारवाईनंतर तब्बल ५१ दिवसांनतरही काश्मीर खोऱ्यातील वातावर अजूनही तापलेले आहे. या हिंसाचारात आतापर्यंत ७० पेक्षा अधिक लोकांनी आपला जीव गमावला आहे. Unfortunately sir a lot of these youngsters have been pushed there by our collective mistakes & mishandling of J&K. — Omar Abdullah (@abdullah_omar) August 28, 2016