महाराष्ट्रीय जेवण दिले नाही म्हणून शिवसेनेच्या ११ खासदारांनी नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदनातील केटरिंगची व्यवस्था पाहणाऱया निरीक्षकाचा रोजाचा उपवास मोडल्याच्या आरोपावरून संसदेच्या दोन्ही सभागृहांत गदारोळ माजला, तर सोशल नेटवर्कींगच्या जालातील ट्विटरवर देखील नेटिझन्सनी शिवसेना खासदारांच्या कृत्याचा निषेध नोंदविला.
रस्त्यावरील धर्मांध गुंड आणि लोकप्रतिनिधी यांच्यात काहीच फरक नसल्याचे दाखवून देणारे हे कृत्य असल्याचे काहींनी म्हटले, तर काहींनी ही घटना म्हणजे भाजप बहुमतात सत्तेवर आल्यानंतर हिंदुत्ववादी संघटनांचे वाढत्या बळाचा पुरावा ठरण्यासारखे असल्याचे मत व्यक्त केले.