नेपाळच्या सोनोली सीमेवरून भारतीय हद्दीत बेकायदेशीरपणे घुसलेल्या पाकव्याप्त काश्मीरमधील १७ नागरिकांना अटक करण्यात आली असून त्यामध्ये तीन महिला आणि १० मुलांचा समावेश आहे, असे सूत्रांनी सांगितले.
पाकिस्तानातून काठमांडू येथे आल्यानंतर या १७ जणांनी भारतीय हद्दीत बेकायदेशीरपणे प्रवेश केला. हे सर्व जण पाकव्याप्त काश्मीरमधील मुझफ्फराबादचे नागरिक असून त्यांनी १९८९ आणि २००९ मध्ये गटागटाने काश्मीरमधून पलायन केले होते.
अटक करण्यात आलेल्यांपैकी काही जण दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
या सर्वाना दिल्लीतील जम्मू-काश्मीर पथकाकडे सोपविण्यात येणार असून त्यानंतर त्यांना केंद्रीय गुप्तचर यंत्रणांच्या हवाली करण्यात येणार आहे.