मुस्लिम समाजाने तिहेरी तलाकच्या मुद्द्याला राजकीय स्वरूप देऊ नये, असे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. ते शनिवारी बसवजयंतीनिमित्त दिल्लीच्या विज्ञान भवनात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी सध्या देशभरात गाजत असलेल्या तिहेरी तलाकच्या प्रथेसंदर्भात भाष्य केले. मुस्लिम समाजच तिहेरी तलाकच्या समस्येवर मार्ग काढू शकतो. त्यासाठी मुस्लिम समाजातील जाणत्या लोकांनी पुढे यायला पाहिजे. जेणेकरून आपण मुस्लिम स्त्रियांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध लढू शकतो आणि त्यामधून मार्ग काढू शकतो. मुस्लिम स्त्रियांनाही त्यांचे मत मांडण्याचा आणि आपल्या हक्कांसाठी आवाज उठविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे समाजातील जाणत्या लोकांनी महिलांना हक्क मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे, असे मोदी यांनी सांगितले. तसेच तिहेरी तलाकच्या मुद्द्याला राजकीय स्वरूप देऊ नये, असे आवाहनही त्यांनी मुस्लिम समाजाला केले.

https://twitter.com/ANI_news/status/85821340513556070

यापूर्वी भुवनेश्वर येथील भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीतही मोदी यांनी ‘तिहेरी तलाक’चा मुद्दा जोरकसपणे मांडत मुस्लीम महिलांना न्याय देण्याची गरज असल्याचे स्पष्ट केले होते. समाजात अनिष्ट रूढी-प्रथा असतील तर त्याबाबत जनजागृती करायला हवी. सामाजिक न्याय महत्त्वाचा आहे. मुस्लीम भगिनींनाही न्याय मिळायला हवा. त्यांच्यावर कोणताही अन्याय होता कामा नये. कोणाचेही शोषण होऊ नये, असे मत मोदींनी मांडले होते.