गंगा नदीचे मोठय़ा प्रमाणावर सुरू असलेले शुद्धीकरण आणि हरिद्वार येथील शांतिकुंज या धार्मिक संघटनेने सुरू केलेल्या जागृती अभियानामुळे नदीचे पाणी चांगल्या प्रकारे शुद्ध होण्यास सुरुवात झाली आहे. याचा मुख्य परिणाम म्हणजे, नदीचे तापमान १९ अंश सेल्सियसवरून १८.१ अंश सेल्सियसवर खाली आले असून पाण्याच्या गढूळपणाचे प्रमाणही लक्षणीयरीत्या घसरून ते १३० ‘नेफेलोमेट्रिक टर्बिडिटी’ युनिटवरून ९० युनिटपर्यंत घसरले आहे. हरिद्वारस्थित देव संस्कृत विश्वविद्यालय आणि गुरुकुल कांग्री विश्वविद्यालय या संस्थांनी केलेल्या अभ्यासानंतर हे निष्कर्ष काढण्यात आले आहेत.गंगा नदीच्या पाण्याचा वेगवेगळ्या पातळीवर अभ्यास करण्यात आला. नदीच्या पाण्याची पारदर्शकता दीडपटीने वाढली असून ती आता १८ सेंटीमीटरवरून ३० सेंटीमीटपर्यंत पोहोचली आहे. क्लोराइडच्या पातळीत मोठी घट झाल्याचे निष्पन्न झाले आहे. हे प्रमाण आता २६ मिलीग्रॅमवरून १६ मिलीग्रॅमपर्यंत खाली आले आहे. ‘निर्मल गंगा अभियान’ कार्यक्रमांतर्गत गेल्या दोन ऑक्टोबरपासून शांतीकुंज या संस्थेने गंगा नदीच्या शुद्धीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला होता.