म्यानमारमध्ये रखीन प्रांतात हिंसाचारानंतर तीन लाख रोहिंग्या मुस्लिमांनी गेल्या पंधरा दिवसांत बांगलादेशात आश्रय घेतला आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांनी दिली आहे. ही संख्या एका दिवसात वीस हजाराने वाढली आहे. २५ ऑगस्टपासून २ लाख ९० हजार रोहिंग्या शरणार्थी बांगलादेशात आले होते, त्यानंतर ही संख्या वाढली आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांच्या शरणार्थी संस्थेचे प्रवक्ते जोसेफ त्रिपुरा यांनी दिली. बांगलादेशातील आणखी काही ठिकाणी रोहिंग्या मुस्लिमांनी आश्रय घेतल्याचे निदर्शनास आले आहे. बरेच रोिहग्या शरणार्थी पायी किंवा बोटीने येत असून, बांगलादेश ते म्यानमार दरम्यानाची २७८ किमी लांबीची सीमा ओलांडून ते आले आहेत. सीमेवर नाफ नावाची नदी आहे. बुधवारी शरणार्थीची संख्या वाढली असून, बांगलादेशात एकूण तीनशे बोटी दाखल झाल्या आहेत. शरणार्थीची संख्या संयुक्त राष्ट्रांनी गुरुवारी १ लाख ६४ हजार असल्याचे जाहीर केले होते. रोहिंग्या मुस्लिमांना म्यानमारमधील बौद्ध बहुसंख्याकांकडून वाईट वागणूक दिली जाते. म्यानमार सरकार त्यांना बांगलादेशातून आलेले बेकायदेशीर स्थलांतरित मानते, पण गेली अनेक शतके रोहिंग्या मुस्लीम तेथे राहात आहेत. बांगलादेश सीमेवर असलेल्या छावण्यांत तीन लाख निर्वासित आले आहेत. गेल्या ऑक्टोबरपासून बांगलादेशात आलेल्या शरणार्थीची संख्या ३ लाख ७७ हजार झाली आहे. म्यानमारमध्ये या मुस्लिमांना जाळपोळ, हिंसाचाराचा सामना करावा लागला आहे. अनेक शरणार्थी चालत सीमेपर्यंत येईपर्यंत आजारी पडले. त्यात काहींचा अन्नपाण्यावाचून मृत्यूही झाला.