समाजवादी पक्षाचे वादग्रस्त आमदार अबु आझमी यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना आव्हान दिले आहे. सरकारच्या परवानगीने आलेल्या पाकिस्तानी कलाकारांना नाहक धमकावण्यापेक्षा हिंमत असेल तर आत्मघातकी पथके बनवून लाहोर आणि कराचीला पाठवावेत, असे थेट आव्हान दिले आहे. पाकिस्तानी कलाकारांनी ४८ तासांत देश सोडावा अन्यथा त्यांना पळवून लावण्यात येईल अशी धमकी मनसेने शुक्रवारी दिली होती. त्या पार्श्वमीवर अबू आझमी यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली. एएनआयएशी बोलताना आझमी म्हणाले, पाकिस्तान भारतात हल्ले करण्यासाठी आत्मघातकी पथके पाठवतो. जर तुमच्यामध्येही (राज ठाकरे) क्षमता असेल तर अधिकृत व्हिसावर भारतात येणाऱ्या लोकांना घाबरवण्यापेक्षा तुमचे आत्मघातकी पथके कराची आणि लाहोरला पाठवा. कलाकारांना धमकी देणे हा मनसेची राजकीय खेळी असल्याचे सांगत ते म्हणाले, पाकिस्तानला विसरा, तुम्ही (राज ठाकरे) खूप छोटे नेते आहात. तुमची धाव फक्त महाराष्ट्रापुरतीच मर्यादित आहे. आज नक्षलवाद्यांकडून गडचिरोली आणि चंद्रपूरमध्ये पोलीस व सुरक्षा दलांवर हल्ले करत आहेत. जर तुम्ही कराची आणि लाहोरमध्ये काही करू शकला नाहीत तर आपल्या कार्यकर्त्यांना किमान चंद्रपूर, गडचिरोलीमध्ये पाठवून आपल्या सुरक्षा दलाची मदत तरी केली पाहिजे. असं काही करू शकलात तरच मी तुमच्यात काही दम आहे असे समजेन, असा टोलाही राज ठाकरे यांना लगावला. पाकिस्तानने आमच्या १८ जवानांची हत्या केली आहे. त्यामुळे आम्हाला दुख:ही झाले आहे. याचा बदलाही घेतला पाहिजे. याचा अर्थ असा नव्हे की तेथून भारतात येणाऱ्या कलाकार आणि खेळाडूंना धमकी द्यावी. जर राज ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी दिल्लीमध्ये जाऊन पाकिस्तानी दुतावास बंद करावा किंवा भारतीय दुतावासाकडून पाकिस्तानी नागरिकांना देण्यात येणाऱ्या व्हिसावर प्रतिबंध आणावा. ते जर असे करू शकले तर त्यांच्यात काही दम आहे असे मी समजेल, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.