पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या जिवाला धोका असल्याचा इशारा इंग्लंडच्या गुप्तचर विभागाने दिला आहे. सीमेपलीकडील दहशतवाद्यांपासून या दोघांना धोका आहे. काश्मीरच्या मार्गाने हे दहशतवादी भारतात घुसले आहेत असे देखील त्यांनी म्हटले आहे.  त्यांचा निशाणा भारतातील दोन मोठे नेते असू शकतात असे इंग्लंड गुप्तचर विभागातील सूत्रांनी इंडिया टुडेला सांगितले आहे. त्यांनी गृहखात्याला सावधानतेचा इशारा दिला आहे.

या दहशतवाद्यांचा ठावठिकाणा अद्याप आम्हाला समजला नाही असे देखील त्यांनी म्हटले आहे. या इशाऱ्यानंतर पंतप्रधानांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.  पंतप्रधानांच्या संरक्षणाची जबाबदारी स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप आणि आदित्यनाथ यांची जबाबदारी एनसीजी कमांडोकडे सोपवण्यात आली आहे. पंतप्रधान मोदी हे दहशतवादी संघटनांच्या हिटलिस्टवर अनेक वर्षांपासून आहेत.

२०१३ मध्ये पटना येथील मोदींच्या सभेत बॉम्बस्फोट झाला होता. तेव्हापासून मोदींच्या सुरक्षेची विशेष काळजी घेतली जाते. महाराष्ट्र गुप्तचर विभागानुसार पंतप्रधान आणि आदित्यनाथ यांच्या जिवाला धोका आहे. आदित्यनाथ यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. आदित्यनाथ यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. त्यांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रीय सुरक्षा दलातील स्पेशल कमांडो आणि शीघ्र कृती दलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. आदित्यनाथ यांच्या जिवाला धोका असल्याची माहिती गुप्तचर विभाग आणि रिसर्च अॅंड अॅनालिसिस विंग (रॉ) ने देखील दिली होती.

काश्मीरमधील काही दहशतवादी संघटना त्यांच्या विरोधात कट रचू शकतात अशी माहिती त्यांच्या हाती लागली होती. आदित्यनाथांच्या सुरक्षेसाठी ३५ एनएसजी कमांडो तैनात करण्यात आले आहेत. त्या व्यतिरिक्त शीघ्र कृती दलातील अधिकारी देखील त्यांच्या सुरक्षेची जबाबदारी उचलणार आहेत. मध्य प्रदेशमधील गुप्तचर विभागाच्या हाती देखील याच प्रकारची माहिती लागली आहे.

नेपाळ आणि बिहारच्या सीमेवरुन दहशतवादी उत्तर प्रदेशमध्ये घुसू शकतात आणि घातपात करू शकतात, ही माहिती मिळाल्यानंतर दहशतवाद विरोधी पथकाने दहा संशयित दहशतवाद्यांना अटक केली आहे. ताब्यात घेतल्या नंतर त्यांची चौकशी करण्यात आली. आम्ही एका नव्या दहशतवादी गटाचे सदस्य आहोत असे त्यांनी म्हटले. भाजपच्या काही नेत्यांना लक्ष्य करण्याचा कट होता असे त्यांनी म्हटले होते. याआधी लखनौ आणि कानपूर या शहरातून देखील काही संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली होती.