पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'मन की बात' मध्ये १९७५ मध्ये लागू करण्यात आलेली आणीबाणी ही देशाच्या इतिहासातील काळरात्र ठरल्याचे सांगत काँग्रेसवर निशाणा साधला होता. काँग्रेसने मोदींच्या या वक्तव्याचा निषेध करत भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारनेच देशात सध्या अघोषित आणीबाणी लागू केल्याचा आरोप करत पलटवार केला आहे. आणीबाणीवरून सुरू झालेला हा राजकीय वाद आता आणखी चिघळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. एनडीटीव्हीचे प्रमुख प्रणव रॉय आणि त्यांच्या पत्नीवर बँकेला फसवल्याचा आरोप, जम्मू काश्मीरमध्ये बिघडलेली स्थिती ही देशात अघोषित आणीबाणी असल्याची काही उदाहरणे असल्याचा आरोप काँग्रेस नेते टॉम वड्डक्कन यांनी केला. आम्ही आणीबाणी विसरलेलो नाही. पण सध्या देशात अघोषित आणीबाणी या सरकारने लागू केली आहे. माध्यमांची मुस्कटदाबी करणे हाही आणीबाणीचाच प्रकार असल्याचे ते म्हणाले. आणीबाणी ही चूक होती, आम्ही स्वीकारतो. आम्ही ती चूक सुधारली आहे. आम्हाला ही चूक सांगताना तुम्ही स्वत: त्यातून काही बोध घ्या, असा टोला त्यांनी लगावला. सध्या आम्ही देशात अघोषित आणीबाणी सहन करत आहोत, असे ते म्हणाले. देशाची अंतर्गत तसेच बाह्य सुरक्षा करण्यात पंतप्रधान सपशेल अपयशी ठरले आहेत. पंतप्रधान 'मन की बात'मध्ये अनेक विषयांना हात घालतात. पण देशांतर्गत सुरक्षेबाबत ते कधी बोलताना दिसले नाहीत. जम्मू काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ले वाढले आहेत. तेथील परिस्थिती चिघळली आहे. पाकपुरस्कृत दहशतवाद आणि फुटीरतावादी लोकांमुळे अंतर्गत परिस्थिती ढासळली आहे. काश्मीर खोऱ्यात फुटीरतावाद्यांचं प्रस्थ वाढलंय. बनावट नोटा बाजारात आणल्या जात आहेत. जमावाकडून पोलिसांना जिवे मारले जात आहे, रोमिओ स्क्वॅडच्या नावाखाली त्रास दिला जात आहे.. हे सर्व काय सुरू आहे ?, असा सवाल त्यांनी विचारला. दरम्यान, मोदी म्हणाले होते की, आणीबाणीच्या काळात वृत्तपत्रांची परिस्थिती बिकट होती. २५ जून १९७५ ची रात्र भारतीय लोकशाहीमधील काळरात्र होती. लोकशाहीवर प्रेम करणारी व्यक्ती आणि भारतातील एकही नागरिक ती काळरात्र विसरु शकत नाही असे सांगत मोदींनी काँग्रेसला चिमटा काढला. संपूर्ण देशाला कारागृहाचे स्वरुप आले होते. विरोधकांचा आवाज दाबला जात होता. जयप्रकाश नारायण, अटलबिहारी वाजपेयींसह असंख्य नेते तुरुंगात होते. न्यायव्यवस्थाही आणीबाणीच्या संकटातून वाचू शकली नव्हती असेही मोदींनी सांगितले होते. यानंतर मोदींनी अटलबिहारी वाजपेयींनी लिहिलेली एक कविताही वाचून दाखवली होती.