कालरात्री, महामारी, शीतला इत्यादी रोगराई निर्माण करणाऱ्या, सृष्टीसंहारक विनाशी देवींचे वाहन म्हणून गर्दभाची योजना केलेली दिसते. ऋग्वेदातील श्रीसूक्तामध्ये अलक्ष्मीची संकल्पना येते. क्षुत्पिपासामलां ज्येष्ठामलक्ष्मीं नाशयाम्यहम् । अभूतिमसमृद्धि च सर्वा निर्णुद मे गृहात् अमांगल्य आणि दारिद्रय़ यांचे रूप असणारी अलक्ष्मी घरातून निघून जावी अशी प्रार्थना केली आहे. पद्मपुराणातील कथेनुसार क्षीरसागर मंथनाच्या वेळी कालकूटानंतर अलक्ष्मी समुत्पन्न झाली. तिने देवांना आपल्या कार्याविषयी विचारले असता, ज्या घरात भांडण-तंटे, असत्य, कठोर भाषण चालते, तेथे तू रहा असे देवांनी तिला सांगितले. अलक्ष्मीं कृष्णवर्णा द्विभुजां कृष्णवस्त्रां पराधीनां लौहाभरणभूषितां शर्कराचन्दनचíचतां गृहसम्मार्जनीहस्तां गर्दभारूढां कलह प्रियाम् काळ्या तोंडाची, हातात केरसुणी घेतलेली, कलहप्रिय असणारी ही अलक्ष्मी गाढवावर आरूढ असल्याचे वर्णन धार्मिक ग्रंथातून येते. गाढव हे त्याच्या कर्कश स्वरासाठी कुप्रसिद्ध आहे. म्हणूनच विशेषत: तमिळ निघण्टु ग्रंथामध्ये गाढव हे तिचे वाहन असल्याचे सांगितले आहे. गाढवाचे ओरडणे हे अमंगल आणि अशुभ घटनांचे सूचक असल्याचे उल्लेख महाभारतासारख्या ग्रंथातही येतात. (दुर्योधन जन्म, भारतीय युद्धाची नांदी इत्यादी प्रसंग). म्हणूनच नवरात्रीमध्ये पूजिल्या जाणाऱ्या नवदुर्गामधील कालरात्री ही देवी गर्दभावर आरूढ असते. गोवर, कांजण्या इत्यादी रोगराईंची देवता शीतला हीसुद्धा गर्दभवाहना आहे. डॉ. सीमा सोनटक्के - response.lokprabha@expressindia.com सौजन्य : लोकप्रभा