मुंबई विद्यापीठात झालेल्या अबॅकस आणि बुद्धीमापन स्पर्धेत राज्यभरातील तीन हजार २०० मुलांनी सहभाग घेतला. मुंबईसह ठाणे, नाशिक, रायगड, धुळे, जळगाव, नंदूरबार येथील विद्यार्थ्यांचा समावेश या स्पर्धेत होता. विद्यापीठाच्या फोर्ट संकुलामध्ये सकाळी ९ ते सायंकाळी ५ या दरम्यान ही स्पर्धा पार पडली. यूसी इंटरनॅशनल कॉपरेरेशनचे संचालक डॉ. दिनो वाँग यांनी या स्पर्धेचे उद्घाटन केले. इयत्ता आणि क्षमता यांनुसार विद्यार्थ्यांची ११ गटनिहाय विभागणी करून ही स्पर्धा घेण्यात आली. यात आठ मिनिटांच्या कालावधीत गणितातील २०० प्रश्न सोडवायचे होते. ८ ते १२ वर्षे वयोगटातील तीन हजार २०० विद्यार्थ्यांनी ही गणिते सोडविली. यात २० मूकबधीर विद्याध्र्याचाही समावेश होता. विद्यार्थ्यांना अबॅकस तंत्र किंवा बुद्धी वापरून ही गणिते सोडवायची होती. ११ वेगवेगळ्या गटातून कमी वेळेत सर्वाधिक गणिते सोडविणाऱ्या ३३० विद्यार्थ्यांना विजेते म्हणून घोषित करण्यात येणार आहे. अंकगणितातील कौशल्य विकसित करण्यासाठी अबॅकस तंत्राचा वापर केला जातो. या स्पर्धेच्या माध्यमातून हुशार व बुद्धीवान विद्यार्थ्यांचा शोध घेतला जातो. इतक्या कमी वेळेत गणितातील कूट प्रश्न सोडविण्याची करामत साधणाऱ्या या चिमुकल्या मुलांचे कौतुक करावे तितके कमीच आहे, असे उद्गार डॉ. वाँग यांनी काढले.स्पर्धेचा बक्षीस समारंभ १६ जानेवारीला होणार आहे.