कोल्हापुरातील टोलवसुली स्थगितीची मुदत ३१ डिसेंबरला संपत आहे. १ जानेवारीला टोलवसुली होणार नाही, याची शाश्वती देता येत नाही, तेव्हा नागपूर अधिवेशनात कोल्हापूर टोलमुक्तीच्या शब्दाची सरकारला जाणीव करून देण्यासाठी आणि अधिवेशनातील निर्णयाची वाट पाहात स्वस्त न बसता १६ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करण्याचा निर्णय आज झालेल्या टोल विरोधी कृती समितीच्या बठकीत घेण्यात आला. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ नेते प्रा. डॉ. एन. डी. पाटील होते.
कोल्हापूर शहर टोल मुक्त करण्यासाठी आयआरबी कंपनीशी चर्चा सुरू आहे. त्यामुळे ३१ डिसेंबपर्यंत कोल्हापुरात टोलवसुलीला स्थगिती देण्यात आली आहे. मात्र सध्या नागपूर येथे सुरू असलेल्या विधिमंडळ अधिवेशनात याच्या कोणत्याही हालचाली दिसून येत नाहीत. त्यामुळे शासनाने कोल्हापूर टोलमुक्तीबाबत दिलेल्या शब्दाची आठवण करून देण्यासाठी १६ डिसेंबरच्या आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे.
प्रा. एन. डी. पाटील म्हणाले, आता आपणास नागपूर अधिवेशन संपेपर्यंत स्वस्त बसता येणार नाही. हिवाळी अधिवेशन २३  डिसेंबरला संपणार आहे. मात्र हे अधिवेशन पूर्णपणे चालू द्यायचे नाही, अशी शासनाची प्रवृत्ती दिसून येते. त्यामुळे कोल्हापूर टोल संदर्भात शासनाने अधिवेशन काळात निर्णय घ्यावा, यासाठी १६ डिसेंबरला अॅक्शन घेण्याची गरज आहे. जिल्हाधिकारी याची माहिती शासनापर्यंत देतील. लोकप्रतिनिधी अधिवेशनात टोलचा प्रश्न उपस्थित करून यावर अधिवेशन संपण्यापूर्वी काहीतर निर्णय निघेल. आपण कोल्हापूरकरांना टोल न देण्याचा शब्द दिला आहे. त्यामुळे १ जानेवारीला नागरिकांना टोल द्यावा लागणार नाही, याची खबरदारी आपण घेण्याची गरज आहे. पण ३१ डिसेंबरला मुदत संपत असल्याने १ जानेवारीला टोलवसुली होणार नाही, याची शाश्वती नाही. तेव्हा १६ रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन करू या, असा सल्ला प्रा. पाटील यांनी दिला, त्यास सर्व कार्यकर्त्यांनी एकमुखी पािठबा दिला.
दिलीप देसाई म्हणाले, लोकांची दिशाभूल करण्यापेक्षा शासनाने कायदेशीर नोटीस काढून कोल्हापुरातून टोल हद्दपार करावा.लाला गायकवाड म्हणाले, शासनाने ३१ डिसेंबरपूर्वी कोल्हापूर टोल मुक्त केले नाही, तर शहरातील टोल नाके उद्ध्वस्त करून ३१ डिसेंबर साजरा करू. सुरेश जरग म्हणाले, अधिवेशन काळात कोल्हापुरातील भाजप कार्यकत्रे मुख्यमंत्र्यांना भेटण्यास जाणार आहेत. तेव्हा आपल्या मागणीचे निवेदन द्यावे, आम्हीही कोल्हापूर टोल मुक्त करण्याची मागणी करणार आहोत.
..तर पालकमंत्र्यांच्या घरावर मोर्चा
अधिवेशन काळात कोल्हापूरच्या टोल मुक्तीचा निर्णय झाला नाही तर त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या घरावर मोर्चा काढू, असे श्री. पाटील यांनी जाहीर केले.
बाबा पार्टे यांनी समारोप केला. जयकुमार िशदे यांनी आभार मानले. यावेळी आर. के. पवार, किसन कल्याणकर, अॅड. पंडितराव सडोलीकर, बाबा इंदूलकर, अॅड. महादेवराव अडगुळे, दिलीप पवार, बाबासाहेब पाटील-भुयेकर, बाबा पार्टे, रमेश मोरे, चंद्रकांत यादव, बजरंग शेलार, दिलीप पोवार आदींसह कार्यकत्रे उपस्थित होते.