क्रिकेटमधील निराशेनंतर कबड्डीमुळे आयुष्याला संजीवनी दहा वर्षांपूर्वी धुळ्यातील एका तरुणाने क्रिकेटपटू होण्याच्या निर्धाराने मुंबई गाठली होती, त्या वेळी त्याच्या पदरी घोर निराशा पडली. मग घराला टाइल्स लावण्याच्या वडिलांच्या व्यवसायात तो त्यांना मदत करू लागला. परंतु कबड्डीने त्याला तारले. स्वप्नांची पूर्ती करणारे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबईत त्याला कबड्डीपटू म्हणून महाराष्ट्र पोलीसमध्ये नोकरी मिळाली. मग वर्षांनुवष्रे भाडय़ाच्या घरातील त्याचा वहिवाट प्रो कबड्डी लीगमुळे संपवला आणि दोन वर्षांपूर्वी महेंद्रसिंग रजपूतने धुळ्यात स्वत:ची जागा घेऊन एक छानसे घर बांधले आहे. कबड्डी खेळामुळेच साकारू शकलेल्या या घराचे नावही त्याने ‘कबड्डी’ असेच ठेवले आहे. महेंद्रला बालपणापासून क्रिकेट आणि कबड्डीची अतिशय आवड होती. सौरव गांगुलीला आदर्श मानणाऱ्या महेंद्रने भारतीय क्रिकेट संघातून खेळण्याचे स्वप्न जोपासले होते. डावखुरा वेगवान गोलंदाज आणि डावखुरी फलंदाजी ही खासियत असणाऱ्या महेंद्रने क्रिकेटमध्ये उत्तम कामगिरी केल्यानंतर शालेय दर्जाच्या निवड चाचणीत सहभागी होण्याच्या इराद्याने मुंबई गाठली. पांढरे शूज होते, परंतु कपडय़ांपासून बाकी बरेचसे साहित्य मित्रांकडून उधार घेऊन तो या चाचणीत खेळला. त्याच्या वेगवान माऱ्याने हॅट्ट्रिकसह लक्षवेधी बळीसुद्धा मिळवले. परंतु त्याची गुणवत्ता डावलण्यात आली. निवड न झाल्यामुळे निराश झालेल्या महेंद्रने पुन्हा धुळे गाठले. महेंद्र आठवीला असल्यापासून जयहिंद क्रीडा मंडळाकडून कबड्डीसुद्धा खेळायचा. क्रिकेटमध्ये कारकीर्द घडवण्यासाठी बरेच पैसे लागतात आणि आव्हान अतिशय कठीण आहे, हे वास्तव उमजल्यानंतर कबड्डीकडेच त्याने गांभीर्याने लक्ष वळवले. जीतूभाऊ ठाकरे आणि मुझफ्फर अली सय्यद यांच्या मार्गदर्शनाखाली त्याने खेळातील कौशल्य विकसित केले. कबड्डीच्या सुरुवातीच्या वाटचालीबाबत महेंद्र म्हणाला, ‘‘दहावी नापास झालो, तेव्हा वडिलांनी माझ्या क्रीडाप्रेमाला अतिशय विरोध केला. मग त्यांच्या टाइल्स लावण्याच्या व्यावसायात मलाही जुंपण्यात आले. वडील सकाळी ८ वाजता उठायचे. मी त्याआधी उठून लपूनछपून सरावाला जायचो आणि सायंकाळी काही कारणे सांगून सामने खेळायचो. माझ्या आईचा या कार्यात मला पाठिंबा होता. मग दहावीचा अडथळा पार केला आणि जयहिंद महाविद्यालयातून बारावीसुद्धा उत्तीर्ण झालो. त्यानंतर धुळे पोलीस विभागात नोकरी मिळवली.’’ ज्या मुंबईत क्रिकेटने निराशा केली, तिथेच कबड्डीने पुन्हा कसे आणले, हे सांगताना अतिशय भावनिक झालेला महेंद्र म्हणाला, ‘‘कबड्डी खेळाच्याच बळावर संपूर्ण महाराष्ट्राच्या पोलीस संघात माझी निवड झाली आणि पुन्हा मुंबईतच नशिबाने आणले. माझी कबड्डी मग खऱ्या अर्थाने बहरली. चार वेळा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले. संघाचे नेतृत्व करण्याचा मानही मिळाला. आता क्रिकेटमधून नव्हे, तर कबड्डीच्या भारतीय संघात स्थान मिळविण्याचे स्वप्न बाळगले आहे.’’