पुढील आठवडय़ात कायदेशीर नोटीस पाठवणार!

द्विराष्ट्रीय क्रिकेट मालिका झिडकारणाऱ्या भारताकडून त्याबद्दल नुकसानभरपाई वसूल करण्याच्या उद्देशाने पाकिस्तान क्रिकेट मंडळ (पीसीबी) पुढील आठवडय़ात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) कायदेशीर नोटीस पाठवणार आहे.

पीसीबीचे कायदेविषयक सल्लागार सलमान नासीर हे या संदर्भातील कायदेशीर तयारीसाठी लंडनला जाऊन आले आहेत. पुढील आठवडय़ात आम्ही ही कार्यवाही करणार आहोत, अशी माहिती पीसीबीच्या पदाधिकाऱ्यांनी दिली.

‘‘नुकसानभरपाईसाठी कसा कायदेशीर दावा करता येईल, याची माहिती घेण्यासाठी नासीर लंडनला गेले होते. आयसीसी बैठकीदरम्यान आम्ही बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्यांना नुकसानभरपाईसंदर्भात कल्पना दिली आहे,’’ अशी माहिती एका पदाधिकाऱ्याने दिली.

२०१४ मध्ये भारत आणि पाकिस्तान या दोन क्रिकेट मंडळांनी स्वाक्षरी केलेल्या सामंजस्य करारांतर्गत भारताविरुद्ध दोन मालिका झाल्या असत्या तर पाकिस्तानला उत्पन्न मिळाले असते. मात्र त्या न झाल्यामुळे नुकसानभरपाई द्यावी, अशी पीसीबीची धारणा आहे.

बीसीसीआयला जर त्यांच्या सरकारकडून दौऱ्यासाठी हिरवा कंदील मिळत नसेल, तर ती आमची समस्या नाही, असे पीसीबीने स्पष्ट केले आहे. याच कराराचा आदर राखत पाकिस्तानने अव्वल तीन देशांचे आयसीसीवरील वर्चस्व आणि सदस्य राष्ट्रांमध्ये महसूल विभागणी या पद्धतीबाबत भारताला विरोध केला नव्हता.

‘‘आमची मागणी न्याय्य आहे. त्यामुळे पाकिस्तानमध्ये खेळण्यास नकार देणाऱ्या बीसीसीआयकडून पूर्ण नुकसानभरपाई मिळण्यासंदर्भात आमची कायदेशीर मागणी भक्कम आहे,’’ असे पीसीबीकडून सांगण्यात आले आहे. पीसीबी-बीसीसीआय सामंजस्य करारानुसार २०१५ ते २०२३ या दरम्यान, दोन देशांमध्ये सहा मालिका होणार होत्या.

यापैकी तीन मालिकांचे यजमानपद पाकिस्तानकडे होते. मात्र सध्या तरी पीसीबीचे अंदाजे २० कोटी डॉलर्सचे नुकसान झाले आहे, असे सांगण्यात येत आहे.