स्त्रियांना आत्मनिर्भर करण्याचं स्वप्न साकार करण्याच्या ऊर्मीतून रेवथी रॉय यांनी उभी केलेली आशियातील पहिली संपूर्ण स्त्रियांची टॅक्सी सव्‍‌र्हिस ‘फॉर्शे’. अवघ्या लाख रुपयांच्या भांडवलावर एका गॅरेजपासून सुरू झालेला हा व्यवसाय पुढे विस्तारत गेला, इतका की यंदाच्या वर्षी ‘हे दीदी बाइक टॅक्सी कंपनी’, ‘झाफिरो लर्निग’ आणि ‘झाफिरो व्हेंचर्स’ या कंपन्याही त्यांनी स्थापन केल्या. उद्देश

दारिद्रय़ रेषेखालील गरजू, इच्छुक मुलींना दुचाकी चालविण्याचं प्रशिक्षण देऊन त्यांना पार्सल डिलिव्हरी सव्‍‌र्हिसमध्ये रोजगार मिळवून देणं. शासनाच्या स्टार्टअप्स, कौशल्यविकास संस्थेच्या माध्यमातून स्त्रियांना आर्थिक स्वातंत्र्य देणाऱ्या, ‘बी द चेंज’ हा मंत्र अंगिकारणाऱ्या रेवथी यांना नुकताच नीती आयोगाचा ‘वुमन ट्रान्स्फॉर्मर इंडिया’ सन्मान मिळाला आहे. त्यांच्याविषयी..

वर्ष २००७. एखाद्या घाईगर्दीच्या वेळी आपण टॅक्सी पकडण्यासाठी म्हणून टॅक्सीला हात करतो. टॅक्सी थांबते. टॅक्सीचालक स्त्री सहजतेने मीटर ‘डाऊन’ करीत आपल्याला आत बसायला खुणावते.. आश्चर्याचा धक्का पचवत आपण आत बसतो. ती स्त्री टॅक्सीचालक गर्दीच्या रस्त्यांमधून सफाईदारपणे वाट काढत आपल्याला सुखरूपपणे इच्छित स्थळी पोहोचवते.

वर्ष २०१६. एखाद्या निवांत संध्याकाळी आपण पिझ्झा ऑर्डर करतो. २५-३० मिनिटांत दारावरची बेल वाजते. पिझ्झा कंपनीच्या नीटनेटक्या पोशाखात पिझ्झाची डिलिव्हरी घेऊन दारात ‘ती’ उभी असते. तिच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास- आपल्या चेहऱ्यावर आश्चर्य..

वरील दोन्ही उदाहरणांमधल्या ‘ती’ला आत्मनिर्भरतेचे पंख देणारी उद्यमशील आणि उपक्रमशील स्त्री म्हणजे आशियातील पहिल्या स्त्री टॅक्सी सेवेच्या तसेच पहिल्या स्त्री पार्सल डिलिव्हरी सेवेच्या संस्थापक-संचालक रेवथी रॉय.

स्त्री रिक्षा चालकांना प्रोत्साहन म्हणून रिक्षा परवान्यांमध्ये ५ टक्के जागा आरक्षित ठेवण्यात आल्या आहेत.  तसेच रिक्षा व टॅक्सी चालक परवान्यासाठी आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या वारसांना परवाना शुल्क पूर्णत: माफ करण्याचा तसेच अटीही शिथिल करण्याचा निर्णय राज्य शासनाने अलीकडेच जाहीर केला आहे. त्याचा लाभ जास्तीत जास्त स्त्रियांनी घ्यायला हवा.

मुंबईच्या प्रभादेवी येथे शालेय शिक्षण व पुढे सेंट झेवियर्स व मुंबई विद्यापीठातून अर्थशास्त्रात पदव्युत्तर पदवी संपादन केलेल्या रेवथी यांना ड्रायव्हिंगचं जबरदस्त वेड होतं. उच्च शिक्षणानंतर एकीकडे मुद्रित प्रसारमाध्यमं, क्षमता विकास, मनुष्यबळ विकास संस्था, स्त्री सक्षमीकरण प्रकल्प, स्वयंसेवी संस्था तसेच शासकीय समित्यांची सल्लागार पदं, व्यवस्थापन क्षेत्रातील विविध प्रशिक्षण संस्थांमध्ये सहभाग, अशी करिअरची उंच कमान आणि दुसरीकडे लग्न, कुटुंबाची जबाबदारी, तीन मुलांचा जन्म, त्यांचा सांभाळ, अशी दुहेरी जबाबदारी सांभाळून आयुष्यात स्थिरस्थावर झाल्या होत्या. मात्र नावीन्य आणि उपक्रमशीलता सतत निरनिराळी क्षेत्रं धुंडाळण्यासाठी त्यांना उद्युक्त करीत होती. तशातच त्यांच्या वयाच्या ४७ व्या वर्षी त्यांच्या पतीचं दीर्घ आजारानं निधन झालं.

पंतप्रधानांच्या कौशल्य विकास कार्यक्रमाच्या धर्तीवर राज्यातही कौशल्य विकास कार्यक्रम सुरू करण्यात आला असून कौशल्य आधारित रोजगार निर्मितीसाठी प्रोत्साहन देण्यात येत आहे. http://www.mssds.in तसेच mahakaushalya.com  या संकेत स्थळांवर या संपूर्ण प्रक्रियेची सविस्तर माहिती देण्यात आली असून प्रशिक्षण देऊ  इच्छिणाऱ्या संस्था तसेच प्रशिक्षण घेऊ  इच्छिणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त अशी ही दोन्ही संकेतस्थळे आहेत. मराठी व इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये या संकेत स्थळांवर माहिती उपलब्ध आहे.

वैयक्तिक आघात पचवत तिन्ही मुलांच्या भविष्याला आकार देणं आणि स्त्रियांना आत्मनिर्भर करण्याचं स्वप्न साकार करण्याच्या ऊर्मीतून २००७ मध्ये त्यांनी सुरू केली, संपूर्ण स्त्रियांची टॅक्सी सव्‍‌र्हिसो१ू२ँी. (फॉर्शे) स्त्रियांना टॅक्सी चालवण्याचं प्रशिक्षण देऊन त्यांना स्वत:च्या पायावर उभं राहायला मदत करणारी प्रशिक्षण संस्था. हे सगळं बोलायला सोपं वाटत असलं तरी १० वर्षांपूर्वी ही कल्पना लोकांच्या पचनी पडायला सोपी नव्हती. एरवी स्वत:चं खासगी वाहन चालवणारी स्त्री बघायची लोकांना सवय होती, तरी स्त्रीचं चार चाकी चालवण्याचं कौशल्य, हा तसा थोडा थट्टेचा विषय होता. त्यामुळे टॅक्सी सर्व्हिस या पूर्णपणे पुरुषी क्षेत्रासाठी स्त्री मिळणं सुरुवातीला थोडं अवघड गेलं. मात्र रेवथी हार मानणाऱ्या नव्हत्या. या क्षेत्रातील खाचखळगे समजण्यासाठी तसेच स्त्री व त्यांच्या कुटुंबीयांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी प्रथम त्या स्वत:च टॅक्सी चालवायच्या. कंपनीच्या संचालक असूनही सुमारे १० महिने त्यांनी स्वत: वाहनचालक म्हणून काम पाहिलं. हळूहळू स्त्रिया पुढे येत गेल्या. चार चाकी वाहन, चालकाचा कडक युनिफॉर्म, कामातून मिळणारं आर्थिक स्वावलंबन अशा अनेक गोष्टींमुळे स्त्रिया त्याकडे आकर्षित होत गेल्या. त्यांना वाहन चालविण्याबरोबरच वाहनाची जुजबी दुरुस्ती, संभाषणकौशल्य, शिष्टाचार संकेत, मुंबईचा इतिहास तसेच रस्त्याचं व रहदारीचं ज्ञान असं सर्व प्रकारचं ज्ञान दिलं जात असे. रेवथी आणि त्यांच्या सहकारी दिवस-रात्र झपाटल्यासारख्या काम करीत होत्या. मैत्रिणीकडून उसने घेतलेले अवघे लाख रुपये भांडवलावर एका गॅरेजपासून सुरू झालेला हा व्यवसाय, पुढे मुंबई-दिल्ली येथे दोन अद्ययावत ऑफिसेस, ६५ वाहने असा विस्तारत गेला. आतापर्यंत हजारो स्त्रियांना त्यांनी टॅक्सी चालविण्याचं प्रशिक्षण दिलं आहे. त्या वेळी त्याच्या प्रशिक्षण वर्गात ८ वी उत्तीर्ण स्त्रीला सशुल्क ३ महिन्यांचे वाहन चालवण्याचं प्रशिक्षण दिलं जात असे. प्रशिक्षित स्त्रियांना ओरिक्स कंपनी वाहनचालकाच्या कामावर ठेवत असे किंवा अन्यत्र त्या वाहनचालकाचं काम करू शकत असत.

झफिरो लर्निग दुचाकी प्रशिक्षण व रोजगारासाठी अर्ज १५, मधू इंडस्ट्रियल इस्टेट, पांडुरंग बुधकर मार्ग, वरळी, मुंबई ४०००१८ या पत्त्यावर उपलब्ध आहेत. तसेच Zaffiro learning.com या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करण्याची सोय उपलब्ध आहे. ४५ दिवसांचे प्रशिक्षण शुल्क १५०० असून राज्य कौशल्य विकास संस्थेच्या नियमानुसार कमीत कमी २० व जास्तीत जास्त ३० स्त्रियांना एका तुकडीमध्ये प्रशिक्षण देता येते. पहिले ७ दिवस वर्गखोलीत वाहतुकीचे नियम, मुंबईची माहिती, सॉफ्ट स्किल इत्यादीचे तर पुढचे ३० दिवस प्रत्यक्ष दुचाकी चालविण्याचे प्रशिक्षण व पुढचे ७ दिवस अ‍ॅडव्हान्स प्रशिक्षण दिले जाते. त्यासाठी ५ ते ७ प्रशिक्षक असतात.

रेवथी यांना या कामाने खूप समाधान मिळवून दिलं. अनेक स्त्रियांना रोजगार मिळवून द्यायला, त्यांची कुटुंबं सावरायला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यात आत्मविश्वास आणि आत्मभान निर्माण करायला मदत केली. त्या आठवणी सांगताना आजही रेवथी भावविभोर होतात. एक स्त्री त्यांना फूटपाथवर दयनीय अवस्थेत सापडली होती. तिला सोबत आणून त्यांनी प्रशिक्षण दिलं आणि स्वत:च्या पायावर उभं केलं. आज तिची मुलगी पशुवैद्यक झाली आहे. अन्य एक स्त्री स्वत:च्या ३ लहान मुलांना घरी कुलपात बंद ठेवून प्रशिक्षण घ्यायला यायची. अतिशय जिद्दीने प्रशिक्षण पूर्ण करून ती आता स्थिरस्थावर झाली, तर आणखी एक स्त्री दारूडय़ा नवऱ्याचा जाच चुकविण्यासाठी टॅक्सीतच झोपायची, पण जिद्दीने प्रशिक्षण पूर्ण करून ती स्वत:च्या पायावर उभी राहिली. अनेक लहान मुलांच्या पालकांनी तसेच वृद्ध पालकांच्या पाल्यांनी अतिशय सुरक्षित आणि स्वच्छतेसह प्रवासाचा अनुभव दिल्याबद्दल ‘फॉर्शे टॅक्सी सव्‍‌र्हिस’लाच पसंती दिल्याचं त्या अभिमानाने सांगतात. तसेच या सर्वासाठी त्या सर्व स्त्रियांची जिद्द, चिकाटी तसेच सर्व सहकाऱ्यांचं व घरच्यांचं मोलाचं योगदान असल्याचं आवर्जून नमूद करतात.

एकीकडे ‘फॉर्शे सव्‍‌र्हिस’चं काम जोमाने विस्तारात असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषित केलेल्या ‘स्टार्टअप इंडिया’ आणि ‘स्किल डेव्हलपमेंट’ या योजना रेवथींना खुणावत होत्या. त्यातूनच चारचाकी टॅक्सी ते टॅक्सी बाइक या संकल्पनेचा प्रवास झाला. ७ मार्च २०१६ रोजी ‘हे दीदी बाइक टॅक्सी कंपनी’ची सुरुवात त्यांनी केली. त्याचबरोबर झाफिरो लर्निग’ आणि ‘झाफिरो व्हेंचर्स’ या आणखी दोन कंपन्या त्यांनी स्थापन केल्या. दारिद्रय़ रेषेखालील गरजू, इच्छुक मुलींना दुचाकी चालविण्याचं प्रशिक्षण देऊन त्यांना पार्सल डिलिव्हरी सव्‍‌र्हिसमध्ये रोजगार मिळवून देणाऱ्या या संस्था. सध्याच्या ‘होम डिलिव्हरी’च्या जमान्यात अन्न, औषधं, वाणसामान, पुस्तकं अशा अनेक वस्तू मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून ऑर्डर करण्यावर ग्राहकांचा भर असतो, हे लक्षात घेऊन या वस्तू दुचाकीवरून घरपोच देण्याच्या सेवेवर रेवथींनी लक्ष केंद्रित केलं आहे. त्यासाठी स्त्रियांना प्रशिक्षित करण्यासाठी राज्याच्या ‘स्त्री व बालविकास’ विभागासोबत त्यांचा करार झाला असून तसेच राज्य कौशल्यविकास संस्थेच्या ‘बार्टी’च्या प्रशिक्षण संस्थांच्या यादीतही त्यांच्या संस्थेचा समावेश करण्यात आला आहे. ८ वी उत्तीर्ण १८ ते ५५ वयोगटातील शारीरिकदृष्टय़ा सक्षम व इच्छुक स्त्रियांना ४५ दिवसांचे दुचाकी चालविण्याचे तसेच या सेवेशी निगडित प्रशिक्षण देऊन त्यानंतर त्यांना रोजगार दिला जातो. या योजनेसाठी ‘महिंद्र अ‍ॅण्ड महिंद्र’सारख्या कंपन्याही पुढे आल्या असून त्यांच्या सीएसआर उपक्रमातून त्यांनी प्रशिक्षणासाठी स्कूटर देऊ  केल्या आहेत. तसेच पिझ्झा हट, केएफसी,

सब-वे, अ‍ॅमेझॉन, ईजीके फूडस् या कंपन्यांचंही सहकार्य लाभत असून या प्रशिक्षित मुलींना रोजगार मिळवून द्यायला या कंपन्या पुढे सरसावल्या आहेत. सध्या मुंबई व बंगळुरू या शहरांमध्ये ही सेवा सुरू झाली आहे. पहिल्या ६ महिन्यांतच ५० मुलींना प्रशिक्षण आणि नोकरी मिळाली असून सध्या ५०० मुलींचं प्रशिक्षण सुरू आहे. या उपक्रमाची मागणी वाढत असून एक हजार मुलींनी नोंदणी केली आहे व दररोज हजारो इच्छुक मुलींचे अर्ज त्यांना प्राप्त होत आहेत. येत्या ३ वर्षांत १० राज्यांमध्ये विस्तार व ५० हजार स्त्रियांना प्रशिक्षण व रोजगार देण्याचा रेवथींचा निर्धार आहे. सर्व वयोगटांतील स्त्रियांचा उत्स्फूर्त प्रतिसाद योजनेला लाभतोय.

इथं प्रशिक्षण घेऊन नोकरीला लागलेली २५ वर्षीय रुपाली गिरी सांगते की, एका कंपनीत ती अकाऊंट्सचं काम बघत होती; परंतु कामाच्या ताणामुळे ती त्रासली होती. तिला नोकरीत बदल हवा होता. ‘झाफिरो लर्निग संस्थे’ची माहिती मिळताच तिने नाव नोंदणी करून दुचाकीचं प्रशिक्षण घेतलं व आज फिरतीची नोकरी करण्याचा आनंद ती घेत आहे. ४९ वर्षीय कुंती शाही यांनी तर प्रौढ वयात वाहन चालविण्याचा आनंद आणि रोजगार असा दुहेरी लाभ मिळाला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. या सव्‍‌र्हिसमधून स्त्रियांना रोजगार तर मिळतो आहेच, पण ग्राहकांना एक उत्तम सेवा उपलब्ध झाली आहे. अनेक वस्तूंची जलद, सुरक्षित आणि मुख्य म्हणजे घरपोच सेवा एका मोबाइल अ‍ॅपच्या क्लिकवर उपलब्ध झाली आहे. स्त्री सक्षमीकरण, रोजगारनिर्मिती आणि उत्तम सेवा असा तिहेरी लाभ या योजनेतून होत आहे.

पुस्तकी शिक्षणापेक्षा स्त्रियांमधील कौशल्यच त्यांना रोजगार मिळवून देऊ  शकते, यावर रेवथींचा विश्वास आहे आणि त्यानुसार जास्तीत-जास्त स्त्रियांना प्रशिक्षित करून रोजगार मिळवून देण्याचं त्यांचं ध्येय आहे. रेवथीजींच्या या दशकभराच्या यशस्वी वाटचालीत त्यांना अनेक मानसन्मान लाभले. सप्टेंबर २०१६ मध्ये नीती आयोगाचा ‘वुमन ट्रान्स्फॉर्मर इंडिया’ सन्मान, २०१३ मध्ये झी वाहिनीचा ‘उंच माझा झोका पुरस्कार’, २०१२ मध्ये गॉडफ्रे-फिलिप्स अमोदिनी ब्रेव्हरी अ‍ॅवॉर्ड, लायन्स क्लब, परमानंद, इनरव्हिल क्लब, ब्लिस इक्विटी, २०१४ मध्ये लाला लजपतराय सन्मान असे अनेक पुरस्कार लाभले. ‘क्लोझिंग दॅट साइड ऑफ द डोअर’ हे त्यांच्या टॅक्सी चालविण्याच्या अनुभवावर आधारित पुस्तकही प्रकाशित झालं आहे. इंग्रजी, मराठी, हिंदूी या भाषांवर त्यांचं प्रभुत्व असून कन्नड, कोंकणी, बंगाली आणि गुजराती या भाषाही त्या उत्तम प्रकारे बोलू शकतात. त्यांचा उत्साह, ऊर्जा आणि सकारात्मकता इतरांनाही प्रेरणा देऊन जातात.

विविध शासकीय योजना समजावून घेऊन त्याचा लाभ गरजूंना करून देण्याची त्यांची तळमळ मनाला भिडते. शासन काही तरी करेल, हे शासनाने करावं अशी नुसती कुंपणावर बसून चर्चा न करता स्वत: बदलाचे शिल्पकार होण्याचं उत्तम उदाहरण म्हणजे रेवथी रॉय. आज भारत महासत्तेकडे वाटचाल करीत असताना समाजातील सर्व घटकांना होणाऱ्या प्रगतीत सामावून घेत सर्व घटकांनी त्यासाठी योगदान देणं आवश्यक आहे, असा नुसता विचार करूनच त्या थांबल्या नाही तर प्रत्यक्ष कृतीतून त्यांनी ते दाखवूनही दिलं आहे. रेवथींकडून प्रेरणा घेत अशा अनेक स्टार्टअप्स, कौशल्यविकास संस्था उभ्या राहतील आणि स्त्री तसेच एकूणच समाजाच्या सक्षमीकरणात आपलं योगदान देतील, एवढी आशा नक्कीच दिसते आहे.

प्रशिक्षण घेणाऱ्या स्त्रियांचे मनोगत

*  मी स्नेहल सुनील उतेकर, वय वर्षे ४७. सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करते, तसेच शिवाजी पार्कच्या कोपऱ्यावर सकाळी उपाहाराचे पदार्थ विकते. त्यासाठी पहाटे साडेतीन वाजता उठावे लागते, पण अतिशय उत्साहाने संध्याकाळी शिकायला येते. इथे आल्यावर एक वेगळीच ऊर्जा मला मिळते.

* मी सीमा हेमंत पडवळ, वय ३६ वर्षे, मला ६ वर्षांचा मुलगा आहे. माझ्या सासऱ्यांची फार इच्छा होती की मी काहीतरी वेगळं करावं. त्याच वेळी या कोर्सची माहिती मिळाली. सासऱ्यांच्या प्रोत्साहनामुळे मी या कोर्ससाठी नाव नोंदवलं. माझ्या प्रशिक्षणाच्या कालावधीत सासरे माझ्या मुलाला सांभाळतात. मला आत्मविश्वास आल्यासारखा वाटतो. कुरियर सेवा क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा आहे.

* मी मीलन वझरकर, वय वर्षे ४५, पेशाने परिचारिका आहे. मला माझ्या रुटीनचा कंटाळा आला होता. नवीन काहीतरी करून बघायची इच्छा होती, म्हणून हा कोर्समध्ये नाव नोंदवलं.  पुढे याच क्षेत्रात यायची इच्छा आहे.

* मी राधिका रमेश शर्मा, वय वर्षे २४, एडिटिंगच्या क्षेत्रात आहे. माझं लग्न ठरलं आहे. होणाऱ्या पतीकडे दुचाकी आहे. आमच्या दोघांचीही इच्छा होती की मला दुचाकी चालवता यावी, म्हणून मी शिकते आहे.

* मी स्वाती राजेंद्र मायनाक, वय वर्षे ४५, मला २ मोठी मुले आहेत, त्यांचं शिक्षण पूर्ण झालं, मी बऱ्यापैकी मोकळी झाले. मुलं व पतींच्या पािठब्याने या वयात काहीतरी नवीन शिकण्याचा आनंद घेते आहे. दुचाकी चालवते आहे.

त्याच्या नजरेतून ‘ती’

आजची स्त्री बदलली आहे, हे नक्की. शतकांच्या हिशेबात तर नक्कीच. काळाच्या ओघात तिने स्वत:मध्ये काही बदल जाणीवपूर्वक केले तर काही नकळतपणे तिच्यात रुजत गेले. वर्षांनुवर्षे चालत आलेली पारंपरिकता आणि नंतर अविभाज्य ठरलेली आधुनिकता यांचा समन्वय साधताना ती अधिकच परिपक्व होत गेली. विचारी होत गेली. पण त्याचबरोबरीने चुका करणं,  बंडखोरी करणं, बेभान होताना वास्तवाचं भान सुटणं, स्वप्नांना कवेत घेताना काळाच्या वेगाशीही स्पर्धा करणं.. तिचं ‘माणूस’ असणं अपरिहार्यपणे तिच्यासोबत होतंच; त्यातूनच ती घडत गेली.. त्यातूनच स्त्रीची ना ना रूपं समाजात दिसतात. या स्त्रीरूपाकडे आजचे पुरुष कसे बघतात? केवळ पुरुष वाचकांकडून आम्ही त्यांची मते मागवतो आहोत.. काय वाटतं आजच्या स्त्रीच्या जगण्याकडे पाहून? तिच्या समाजातल्या स्थानाविषयी.. तिचा वेग घाबरवतो? असुरक्षित वाटतं? तुम्ही कुठे आहात त्या सगळ्या प्रक्रियेमध्ये असं वाटतं? किंवा  अन्य काही..  तुमचे  विचार आम्हाला ४०० शब्दांत ५ डिसेंबपर्यंत पाठवा पत्रावर- त्याच्या नजरेतून ‘ती’ – असा   उल्लेख असणे  आवश्यक  आहे.

आमचा पत्ता – लोकसत्ता, चतुरंग, ईएल – १३८,

टीटीसी इंडस्ट्रिअल इस्टेट, महापे, नवी मुंबई, ४०० ७१०.

ई-मेल – chaturang@expressindia.com किंवा chaturangnew@gmail.com

मीनल जोगळेकर – meenalsj0@gmail.com