ब्रिटनचे हवामान निराशाजनक आहे असे सांगणारे अनेक लोक भेटतील. वर्षभर कधीही पडणारा पाऊस, थंडी, वारे, क्वचितच घडणारे सूर्यदर्शन अशा प्रकारचे निराशाजनक चित्र आम्ही ब्रिटनमध्ये येण्याआधी खूप lok03लोकांनी रंगवून सांगितले होते. त्यात आम्ही स्कॉटलंडला राहणार म्हणजे अजूनच उत्तरेकडे.. त्यामुळे अजूनच वाईट. आम्ही मनातून खूप घाबरलो होतो. ठरवले होते, की एकच वर्ष राहू आणि मग दुसरीकडे जाऊ. पण जसेजसे आम्ही इथल्या लोकांशी, इथल्या संस्कृतीशी जुळवून घेऊ लागलो तसे इथल्या हवामानाशीही जुळवून घेऊ लागलो. आणि आता तर इतकी वष्रे झाली; आम्ही स्कॉटलंडच्या प्रेमात आहोत. ब्रिटनमध्ये चार ऋतू आहेत- उन्हाळा (जून ते ऑगस्ट), शिशिर (सप्टेंबर ते नोव्हेंबर), हिवाळा (डिसेंबर ते फेब्रुवारी) आणि वसंत (मार्च ते मे). पावसाळा असा वेगळा ऋतू येथे नाही. वर्षभरात पाऊस कधीही पडतो. पण त्यातल्या त्यात एप्रिल आणि ऑक्टोबर या महिन्यांमध्ये अधिक पाऊस असतो.
सुरुवातीला आम्ही येथे आलो तेव्हा जून महिना होता. येथे उन्हाळा असला तरी मला मात्र खूप थंडी वाजायची. येथे उन्हाळ्यात साधारण १५ ते २० डिग्री तापमान असते. अगदी क्वचित २२ पर्यंत जाते. एवढय़ा वर्षांत एक दिवस २७ पर्यंत गेले होते. बरे, असेही नाही की तापमान एकदा १८ डिग्री असले की अनेक दिवस १८ डिग्रीच राहील. इथले तापमान आहे लहरी. आज १८, तर उद्या १५, परवा २०, तर नंतर एकदम १३. पण येथे आल्यावर एक जाणवले, ते म्हणजे ‘क्वचितच घडणारे सूर्यदर्शन’ असे सांगणारे लोक धडधडीत खोटे बोलत आहेत. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये भरपूर ‘सनी’ दिवस आम्हाला मिळतात. उन्हाळ्यात सकाळी चार वाजताच उजाडते आणि रात्री अकरापर्यंत लक्ख उजेड असतो. त्यामुळे हवा तेवढा वेळ उन्हात िहडायला मोकळीक असते. सूर्य मावळला तरी गुडूप अंधार तसा कधीच होत नाही. अर्थात कधीही ढग येऊन पाऊस येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पण इतक्या ‘सनी’ दिवसांसाठी एखाद-दुसरा पाऊस चालून जातो. आता तर येथील उन्हाळ्याची इतकी सवय झाली आहे की तापमान १५ डिग्रीच्यावर गेले की आम्हाला उकडायला लागते.
उन्हाळ्यात थोडेसे गावाबाहेर गेले तर िहडायला खूप मजा येते. चोहो बाजूंना पसरलेली हिरवळ, त्यावर चरणाऱ्या गायी आणि मेंढय़ा, जवळच कुठेतरी खळाळत वाहणारी स्वच्छ नदी, शांत निश्चल (tranquil किंवा serene या अर्थी) निसर्ग आणि सूर्यदेवाची झालेली कृपा! स्वर्गीय सुख कदाचित यालाच म्हणतात. अशातच दूरवर कुठेतरी झोपडीवजा घर दिसते आणि वाटते हेच ते आपल्या स्वप्नातले घर. निसर्गाच्या सान्निध्यात राहण्याऱ्या तेथील माणसांचा क्षणभर प्रचंड हेवा वाटतो. असे कितीतरी उन्हाळे आम्ही कितीतरी वेगवेगळ्या ठिकाणी भटकलो आहोत. प्रत्येक वेळी एक नवाच आनंद मिळाला आहे. lr11उन्हाळा संपल्यानंतर ऑटम म्हणजे शिशिर ऋतू येतो. माझ्या इतक्या वर्षांचा अनुभव असा आहे की, शिशिर संपेपर्यंत तापमान कमी कमी होत गेले तरी हिवाळा सुरूहोईपर्यंत अगदी उबदार वाटते.  हिवाळ्याची चाहूल देणाऱ्या शिशिर ऋतूचे सौंदर्यसुद्धा काही कमी नसते. हिरव्यागार झाडांची पाने रंग बदलायला लागतात पिवळ्या, लाल आणि केशरी रंगांचे साम्राज्य सगळीकडे पसरते. निसर्गाचे रूप पूर्णपणे बदललेले असते. हे सौंदर्य वेगळेच असते. येथे ऑटम कलर्स बघायला म्हणून मुद्दाम सहली केल्या जातात. आता लवकरच हिवाळा येणार आहे तेव्हा जेवढे उन्ह मिळते तेवढे घ्या, भटकून घ्या, हिंडून घ्या असाही त्यामागे एक दृष्टिकोन असतो. अशा वेळी पुढचे तीन महिने हिवाळ्याशी सामना करायला उत्साह येतो. हळूहळू ऑटम कलर्स विटत जाऊन झाडांची पाने गळून पडतात. एकही पान नसले
ली झाडे पाहिली की हिवाळ्याची पहिली जाणीव होते.इथे आल्यानंतर पहिल्या वर्षीची थंडी मला फारच कठीण गेली. उन्हाळ्याच्या अगदी उलट येथील थंडी. सूर्य सकाळी आठ वाजता उगवणार आणि तीन वाजताच मावळणार. सूर्य मावळला की गुडूप अंधार.  त्यामुळे बहुतांश दिवस अंधारातच काढायला लागतो. दिवसभर जर ढगाळ वातावरण असले तर मग विचारूच नका.  नोकरी करणारे लोक तर अंधारातच ऑफिसला जाणार आणि अंधारातच परत येणार. प्रचंड बोचरी थंडी, अधेमधे पडणारा बर्फ, आणि बाहेर पडायचे झाले तर कमीत कमी २-३ कपडय़ांचे थर अंगावर चढवावे लागतात. (इथे एकच एक जाड कोट घालण्यापेक्षा कपडय़ांचे २-३ थर चढवले की अधिक उष्णता मिळते. आणि चुकूनमाकून उकडायला लागलेच तर एखादा थर कमी करता येतो.) एकेकटय़ा राहणाऱ्या लोकांना इथला हिवाळा फारच निराशाजनक आहे. पण यावरही उपाय आहे. तो म्हणजे थंडीतसुद्धा येथे ऊन पडते हे लक्षात ठेवणे. जेव्हा जेव्हा बाहेर सूर्य आहे तेव्हा तेव्हा थंडी असली तरीही आळस न करता बाहेर जाणे आणि मिळेल तेवढे ऊन खाणे. सूर्यदर्शन आणि उन्हाचे महत्त्व मला इथे येऊनच पटले. हिवाळ्यातले सूर्यदर्शन येथे फारच मोहक असते. वातावरणात थंडी असते, पण सूर्य दिसल्यामुळे अगदी किंचित का होईना ऊब जाणवत असते. उन्हात काहीच दम नसतो, पण मानसिक आधार असतो की ऊन पडले आहे! त्यात जर बर्फ पडलेला असेल तर शुभ्र बर्फावर चमकणारे ऊन मला कायमच मोहीत करते. ते दर्शन एकदा मिळावे, म्हणून असे किमान दहातरी हिवाळे सहन करायला मी तयार आहे.
वर्षभरात सर्वात जास्त आनंद घेऊन येणारा ऋतू म्हणजे वसंत (िस्प्रग). दिवस मोठा होतो, तापमान वाढायला लागते, नियमितपणे ऊन पडायला लागते. पाने गळून पडलेल्या झाडांवर सुरुवातीला कोवळे कोंब दिसायला लागतात आणि आठेक दिवसांत कोवळी पालवी फुटायला लागते. उन्हाळा येईपर्यंत झाडे पुन्हा हिरवीगार होऊन जातात. चेरीची झाडे बहरू लागतात. गुलाबी-पांढऱ्या रंगाच्या फुलांनी भरलेली चेरीची झाडे हे वसंत ऋतूचे प्रमुख आकर्षण आहे. बोचरी थंडी संपली, आता उन्हाळा येणार, सूर्य आपल्यावर कृपा करणार या नुसत्या जाणिवेनेच मनाची मरगळ झटकली जाते. कोणतेही काम करण्यासाठी अभूतपूर्व उत्साह येतो. हळूहळू भटकंती पुन्हा सुरू होते. उन्हाळ्यात कुठेकुठे भटकायचे याचे बेत सुरूहोतात. वसंत ऋतू कायमच येथे एक नवीन उत्साह आणि एक नवी सुरुवात घेऊन येतो.
स्कॉटलंडमध्ये आल्यावर येथील निसर्गाकडून मी खूप काही शिकले. घाबरवणारे लोक मला खूप भेटले, पण हेच लोक सूर्य दर्शन देत असताना त्याच्याकडे पाठ करून झोप काढणारे होते, ऊन पडलेले असताना आळस करून घरात बसणारे होते. निसर्गावर प्रेम करणारा माणूस येथे कधीच दु:खी राहणार नाही, त्याला कसलीही भीती वाटणार नाही. येथील निसर्गाने मला अनिश्चिततेवर प्रेम करायला शिकवले. आयुष्याचे साधेसोपे तत्त्वज्ञान येथील निसर्ग शिकवतो. डोळे उघडे आणि मन मोकळे ठेवले तर आनंदाचे क्षण अनंत असतात. आजचा क्षण महत्त्वाचा आहे. काल काय घडले, उद्या काय घडणार याच्या विचारात वेळ घालवण्यापेक्षा आज कोणता आनंद मिळतो आहे तो भरभरून घ्यायला आणि आज आनंद नसेल तर उद्या नक्की मिळेल, अशी आशा ठेवायला येथील निसर्गच शिकवतो.