गाझियाबादमधील आम आदमी पक्षाच्या उमेदवार शाजिया इल्मी यांच्या वादग्रस्त विधानाचा समाचार घेत भाजपने आम आदमी पक्ष हा फक्त चमकोगिरी करून मतांचे राजकारण करत असल्याचे म्हटले आहे.
मुस्लिमांनी जातीयवादी बनले पाहिजे, अशा आशयाचे विधान शाजिया इल्मी यांनी केल्याचा एक व्हिडिओ यूट्यूबवर आहे. यावर टीका करताना भाजप नेते आणि लोकसभा उमेदवार अरुण जेटली म्हणाले की, “आम आदमी पक्ष हा समाजात चमकोगिरी करून केंद्रस्थानी कसे राहता येईल अशी विचारसरणी असणारा पक्ष आहे. मतांचे राजकारण करण्याचे उद्दिष्ट आता पक्षाच्या नेत्यांकडून होणाऱया वक्तव्यातून दिसून येते. यातून केवळ संधिसाधूपणाची वृत्ती निदर्शनास येते. दिल्लीत आपचे सरकार ‘प्रशासन आपत्ती’ असल्याचे सिद्ध झाले आहे.” असेही जेटली म्हणाले.
“पक्ष नेत्यांकडून होणारी अशा प्रकारची वक्तव्ये पक्षाची विचारसरणी स्पष्ट करतात. केलेले विधान पक्षीय पातळीवरील आहे. केवळ मते झोळीत पाडण्यासाठी अशी विधाने केली जात आहेत. या विधानातून आपची विचारसरणी जनतेच्या नजरेसमोर आली आहे.” असेही जेटली यांनी इल्मींचे नाव न घेता टीका केली.
मुस्लिमांनी जातीयवादी बनले पाहिजे – ‘आप’च्या इल्मींची मुक्ताफळे