नेवासे शहरातील आसीफ युसूफ पटेल याच्या खूनप्रकरणी लष्करे टोळीच्या तिघा आरोपींना नेवासे येथील जिल्हा व सत्र न्यायधीश शरद कुलकर्णी यांनी तीन वर्षे जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अन्य पाच आरोपींना पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले. खटल्यातील एका आरोपीला नुकतीच अटक करण्यात आली असून त्याच्यावरील खटला पुन्हा स्वतंत्रपणे चालवण्यात येणार आहे.आरोपी सोपान भगवान गाडे (वय २२), धनंजय उर्फ गोविंद उर्फ धनू अशोक काळे (वय २२), बिटू उर्फ अनिल चिमाजी लष्करे (वय ३२) यांना न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच प्रत्येकी २५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास एक वर्षाची शिक्षा त्यांना भोगावी लागणार आहे. न्यायालयाने रवींद्र बबन काळे, संतोष जगन्नाथ पंडुरे, अंबादास लक्ष्मण धोत्रे, राजेंद्र कारभारी काळे, संजय लक्ष्मण सुखदान यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली.खटल्यात सरकारतर्फे वकील भानुदास तांबे, प्रमोद वलटे, के. जी. रोकडे तर आरोपीच्या वतीने रवींद्र भोसले, मुरलीधर कर्डक, कुंदन परदेशी, अशोक कर्डक, अनिल आगळे यांनी काम पाहिले. पोलिसांनी तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र पाठविले होते. आरोपीकडून वसूल झालेल्या दंडापैकी ७० हजार रुपये फिर्यादी व मृत अासीफ पटेलची आई हमिदाबी पटेल हिला देण्याचा आदेशही न्यायालयाने दिला.या खूनखटल्याची सविस्तर हकिगत अशी, दि. ३१ ऑगस्ट २०११ रोजी ईदच्या वेळी नेवासे खुर्द गावात राजू जहागिरदार यांच्या नावाचा शुभेच्छाफलक लावण्यात आला होता. हा फलक गंगानगर भागातील मुलांनी फाडल्याच्या कारणावरून दंगल झाली. त्यामध्ये झालेल्या दंगलीत पटेल याचे घर जाळण्यात आले होते. त्याची फिर्याद अासीफची आई हमिदाबी हिने पोलीस ठाण्यात दिली. त्यामध्ये संशयित म्हणून आरोपींची नावे टाकण्यात आली. त्याचा राग येऊन अासीफ पटेल हा खुपटी रस्त्यावर शेतातील पाइपलाइन दुरुस्ती करण्यासाठी भाऊ एजाजसमवेत गेला असता त्याचा खून करण्यात आला. दोघा भावांच्या दुचाकीला आरोपींनी अडवून शिवीगाळ केली. गावठी पिस्तुलातून आसीफ याच्यावर गोळ्या झाडून खून करण्यात आला. या वेळी एजाज हा पळून गेला. त्याने हा प्रकार आईला सांगितला. त्यानंतर नेवासे पोलीस ठाण्यात फिर्याद नोंदविण्यात आली. आरोपींना अटक करून न्यायालयात आरोपपत्र पाठविण्यात आले. खटल्यातील एक आरोपी सोन्या उर्फ सुनील मोहन परदेशी हा फरार होता. तो मागील महिन्यात पकडला. त्याच्यावर स्वतंत्रपणे खटला चालविला जाणार आहे.या खटल्याच्या निकालाच्या पार्श्र्वभूमीवर नेवासे शहरात मोठा पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. पोलीस निरीक्षक सुरेश शिंदे यांनी निकालाच्या आधी चार दिवस शांतता समितीची बैठक आयोजित केली होती. या खटल्याचा मंगळवारी निकाल असल्याने शहरातील शाळेतही मुलांची उपस्थिती कमी होती.