बेळगाव, निपाणीसह कर्नाटकातला मराठी भाषिकांचा भाग महाराष्ट्रात येण्याची मागणी चुकीची असल्याचं वक्तव्य भाजप खासदार शरद बनसोडे यांनी म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्यामुळे शिवसेना खवळणार हे निश्चित आहे. आमचे मुंबईचे काही मित्र बेळगाव महाराष्ट्रात येण्याची मागणी करत आहेत, मात्र त्यांना हे ठाऊक आहे का? की सांगलीतल्या जत तालुक्यात उमदी नावाचे एक गाव आहे, २५ हजार लोकवस्तीच्या या गावात एकही माणूस मराठी भाषा बोलत नाही. सगळे गावकरी कन्नडच बोलतात तरीही ते सगळे गावकरी महाराष्ट्रात राहतात मग तुम्ही बेळगाव कसं काय बरं मागता? असा प्रश्नही शरद बनसोडे यांनी विचारला आहे. शिवसेनेचे नाव न घेता फक्त मुंबईचे मित्र एवढाच उल्लेख करत बनसोडे यांनी शिवसेनेच्या सीमा प्रश्न सोडवण्याच्या मागणीला आव्हान दिलं आहे. सोलापुरात सुरू असलेल्या राज्य कन्नड साहित्य संमेलनात त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. सीमाप्रश्नावर शिवसेनेचं नावही न घेता त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. मात्र बेळगाव-कारवार आणि निपाणी यांचा समावेश महाराष्ट्रात झालाच पाहिजे अशी शिवसेनेची मागणी आहे. या मागणीवर आता भाजप खासदार असलेल्या शरद बनसोडे यांनी आपली भूमिका मांडून एक प्रकारे सेनेला आव्हानच दिलं आहे. वेळोवेळी शिवसेनेनं सीमा प्रश्न सोडवण्यासाठी मागणी केली आहे. मात्र बेळगाव-कारवार निपाणीचा हा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून भिजत पडला आहे. काही दिवसांपूर्वीच या ठिकाणी झालेल्या आंदोलनातही शिवसेनेनं सहभाग घेतला होता. आता भाजप खासदार शरद बनसोडे यांनी शिवसेनेच्या विरोधात भूमिका घेतल्यानं आणि ही मागणीच चुकीची आहे असं म्हटल्यानं नवा वाद निर्माण होणार हे निश्चित मानलं जातं आहे.