सिंधुदुर्गच्या पर्यटनदृष्टय़ा पायाभूत विकासाकडे दुर्लक्ष होत असल्याने येत्या १ मे रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषण करण्याचा इशारा पर्यटन प्रेमींनी दिला आहे. पर्यटनमंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी यांना याबाबत अतुल हुले, डी. के. सावंत, भाई देऊलकर, दीनानाथ बांदेकर व अशोक देसाई यांनी निवेदन दिले. सिंधुदुर्ग जिल्हा पहिला पर्यटन जिल्हा घोषित होऊन २० वर्षे झाली तरी पर्यटन विकासाबाबत दुर्लक्षित राहिल्याने उपोषणाचा इशारा दिला आहे. जिल्ह्यातील कार्यरत पर्यटन संस्था व पर्यटन व्यावसायिक यांचे बरोबरच निवासी न्याहारी आयोजकांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेक पर्यटन संस्था बंद पडल्या आहेत. निवासी न्याहारी आयोजकांप्रमाणे हॉटेल व्यावसायिकसुद्धा आर्थिक अडचणीत आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. पर्यटन महामंडळाच्या नियोजनशून्य कारभारामुळे २० वर्षांत पर्यटनासाठी कोटय़वधीचा निधी खर्च होऊनही प्रत्यक्षात सुधारणा झालेली नाही. जनतेच्या पैशाची उधळपट्टी होत असून पर्यटन महामंडळाने पर्यटन प्रेमी, पर्यटन व्यावसायिकांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील पर्यटन व्यावसायिकांच्या समस्या निवारण्यासाठी बैठक बोलवावी, जिल्ह्यातील पर्यटनासाठी स्थानिक पर्यटन समिती निर्माण करावी या पर्यटन समितीची सभा महिन्यातून एकदा तरी व्हावी. प्रकल्पासाठी समिती व पर्यटन व्यावसायिकांच्या मताला प्राधान्य द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. सावंतवाडी शिल्पग्राम, आयुर्वेद पंचकर्म केंद्र, म्युझिकल कारंजे, अंबोली पर्यटन संकुल, कावळेसार पॉइन्ट, महादेवगड, आंबोली धबधब्याजवळील चेंजिंग रूम आदी ठिकाणच्या दुरवस्था व करण्यात आलेल्या खर्चाची चौकशी करावी तसेच सावंतवाडी, आंबोली, विजयदुर्ग हॉटेलची जाहीर निविदा काढावी, पर्यटन स्थळावर जाण्यासाठी बस द्यावी, तारकर्ली पर्यटन केंद्र चालविण्यास द्यावे अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.