नक्षलवाद्यांच्या विरोधात प्रभावी कामगिरी बजावणारे गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांची साधे कार्यालय नसलेल्या पालघरला बदली करण्यात आल्याने पोलिस दलात तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. ऐन निवडणुकीच्या हंगामात हा कर्तव्यदक्ष अधिकारी एकाही राज्यकर्त्यांला नको असल्यानेच हक यांना पालघर देण्यात आले, अशी माहिती आता समोर आली आहे.आघाडी सरकारने दोन दिवसांपूर्वी राज्यातील वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश जारी केले. त्यात गडचिरोलीचे पोलिस अधीक्षक सुवेझ हक यांचाही समावेश आहे. गेल्या तीन वर्षांत हक यांनी गडचिरोलीत नक्षलवाद्यांच्या विरोधात अतिशय प्रभावी कामगिरी बजावली. या काळात हक व त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वाधिक नक्षलवादी ठार मारले. त्यांच्या कार्यकाळात शरणागती पत्करणाऱ्या नक्षलवाद्यांची संख्याही वाढली. हक यांच्या कामगिरीची दखल केंद्रीय गृहमंत्रालयानेसुद्धा घेतली. हक यांनी पोलिस महानिरीक्षक रवींद्र कदम यांच्या मदतीने अनेक योजना गडचिरोलीत यशस्वी करून दाखवल्या. त्यांना बदलीच्या वेळी अतिशय चांगल्या ठिकाणी नेमणूक मिळेल, असे अपेक्षित असताना राज्यातील आघाडी सरकारने पुन्हा एकदा एका कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याचा हिरमोड केला आहे. गडचिरोलीत काम करणाऱ्या अधिकाऱ्यांना बदलीस पात्र झाल्यानंतर चांगल्या ठिकाणी नेमणूक मिळेल, असे शासनाचे धोरण आहे. हक यांच्या बाबतीत मात्र या धोरणालाच हरताळ फासला गेला आहे. हक यांना नव्याने निर्माण झालेल्या पालघर जिल्ह्य़ाची जबाबदारी देण्यात आली आहे. साधे कार्यालयही नसलेल्या ठिकाणी या अधिकाऱ्याला नेमणे, हा त्याच्या कर्तृत्वाचाच अपमान आहे, अशी प्रतिक्रिया पोलिस दलात आता व्यक्त होत आहे. स्वत: हक यांनी मात्र अतिशय संयम बाळगून,‘कदाचित सरकारला पालघरला माझी गरज असेल,’ अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, तीन वर्षांपूर्वी गडचिरोलीत कुणीही काम करायला तयार नसताना हक यांनी स्वत:हून तेथे काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती. आता त्यांना तेथून बदलताना पुन्हा तोच प्रकार सरकारी पातळीवरून त्यांच्या बाबतीत घडला आहे, असे मत गृहखात्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने व्यक्त केले.सरकारच्या या धोरणामुळे गडचिरोलीत काम करायला अधिकारी कसे तयार होतील, असा सवाल आता पोलिस दलात उपस्थित केला जात आहे. सुवेझ हक गेल्या सहा महिन्यांपासून बदलीस पात्र होते. मात्र, त्यांच्या जागी जायला एकही पोलिस अधिकारी तयार नव्हता. नंतर इशु सिंधू तयार झाले. त्यांनी ऐनवेळी माघार घेतली. यामुळे अडचणीत आलेल्या गृहखात्याने अखेर संदीप पाटील यांना तयार केले.सत्ताधाऱ्यांना नको होते..गृहमंत्रालयातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐन निवडणुकीच्या काळात एकही सत्ताधारी नेता हक यांना आपल्या जिल्ह्य़ात येऊ देण्यास तयार नव्हता. निवडणुकीच्या काळात राज्यकर्त्यांना, तसेच सत्तारूढ पक्षाच्या आमदारांना आपल्या कलाने चालणारे अधिकारी हवे असतात. हक या व्याख्येत बसणारे नव्हते. अखेर कुणीही रुजू होण्यास तयार नसलेल्या पालघरची जबाबदारी हक यांच्यावर सोपवण्यात आली.