राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या तिसऱ्या टप्प्यातील निवडणुकांचे निकाल सोमवारी जाहीर झाले. यामध्ये काँग्रेस पक्षाने नांदेड जिल्ह्यासह औरंगाबादमध्ये लक्षणीय यश मिळवले. यापूर्वी दोन टप्प्यात झालेल्या निवडणुकांमध्ये भाजप हा नगरसेवक आणि नगराध्यक्षांच्याबाबतीत पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरला होता. विशेषत: पश्चिम महाराष्ट्रात पक्षाने लक्षणीय यश मिळवले होते. त्यामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला होता. मात्र, आजच्या निकालांनी भाजपच्या या विजयी घौडदौडीला काहीप्रमाणात लगाम बसला. याउलट गेल्या काही निवडणुकांमध्ये अपेक्षित यश न मिळवून शकलेल्या काँग्रेसची मराठवाड्यातील कामगिरी यावेळी सुधारताना दिसली. मराठवाड्यातील नांदेड व औरंगाबाद जिल्ह्यातील नगरपालिकांच्या निकालांकडे राजकीय वर्तुळाचे विशेष लक्ष होते. यापैकी नांदेड जिल्ह्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि औरंगाबादमध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या लढतीत अशोक चव्हाणांची सरशी झाली. अशोक चव्हाण यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसला केवळ नांदेडच्या बालेकिल्यातच नव्हे तर औरंगाबादमध्येही मोठे यश मिळाले. भाजपने मुखेड आणि कुंडलवाडी नगरपालिकांची सत्ता मिळवली असली तरी उर्वरित पालिकांमध्ये काँग्रेसने आपले वर्चस्व कायम राखले. यामध्ये हदगाव, बिलोली, मुदखेड, देगलूर नगरपालिका आणि अर्धापूर नगरपंचायतीचा समावेश आहे. तर धर्माबाद व उमरी पालिकेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि कंधार नगरपालिकेवर शिवसेनेने झेंडा फडकवला. या पालिकांमध्ये काँग्रेसची सत्ता आली नसली तरी जिल्ह्यातील ९ पैकी सहा पालिकांवर काँग्रेसचे नगराध्यक्ष निवडून आले आहेत. याशिवाय, औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड व खुलताबाद नगरपालिकेत काँग्रेस पक्षाने सर्वाधिक ९ आणि ८ जागांवर विजय मिळवला आहे. या दोन्ही ठिकाणी नगराध्यक्षपदीही काँग्रेसचेच उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेसचे हे यश भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि आमदार प्रशांत बंब यांच्या वर्चस्वाला मोठा धक्का देणारे ठरले आहे. आजच्या निकालांमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातून काँग्रेसचे सर्वाधिक ३३ नगरसेवक निवडून आले आहेत. एकीकडे हे चित्र भाजपसाठी आशादायी असले तरी निकाल जाहीर झाल्यानंतर जिल्हाध्यक्ष अब्दूल सत्तार यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांच्यावर आगपाखड करत आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने काँग्रेसमधील अंतर्गत कलह पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला. पक्ष नेतृत्त्वाने निवडणुकीच्या प्रचारावेळी अपेक्षित पाठिंबा न दिल्याचा आरोप यावेळी अब्दूल सत्तार यांनी केला. तर दुसरीकडे पक्षाचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या विदर्भातील भंडारा व गडचिरोलीमध्ये पवनी नगरपालिकेचा अपवाद वगळता भाजपने निर्विवाद यश मिळवले. याशिवाय, दोन्ही जिल्ह्यातील सहापैकी पाच नगरपालिकांवर भाजपचे नगराध्यक्ष निवडून आले. केवळ पवनी नगरपालिकेत स्थानिक आघाडीचा उमेदवार निवडून आला. या निकालांमुळे भाजपने राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या भंडारा जिल्ह्यातील वर्चस्वाला शह दिल्याचे स्पष्टपणे दिसून आले. भंडारा जिल्ह्यातील तुमसरनगर पालिकेतील २३ पैकी १५ , भंडारा पालिकेत ३३ पैकी १५ , साकोलीतील १७ पैकी १२ आणि पवनी नगरपालिकेतील दोन जागांवर भाजपने विजय मिळवला. तर गडचिरोली नगरपालिकेच्या २४ पैकी २० आणि देसाईगंज पालिकेच्या १७ पैकी १२ जागा जिंकत भाजपने विदर्भ आपला बालेकिल्ला असल्याचे सिद्ध केले.