आई-वडील आणि मुलावर कुऱ्हाडीचे वार उल्हासनगरजवळील हाजी मलंगच्या पायथ्याशी करवले गावाबाहेरील शेतघरात शंकर नामदेव भंडारी (६०), त्यांची पत्नी फसुबाई (४८) आणि धाकटा मुलगा सनी (२२) या तिघांची गुरुवारी पहाटे कुऱ्हाडीने हत्या करण्यात आली. या हत्येने परिसरात खळबळ उडाली आहे. मारेकऱ्यांनी हत्येसाठी वापरलेल्या तिन्ही कुऱ्हाडी तिथेच टाकल्याने पोलीसही चक्रावले आहेत. वारकरी असलेले भंडारी कुटुंब दूधविक्रीचा व्यवसाय करते. अंबरनाथ तालुक्यातील करवले येथे ते राहात होते. सनी पदवी परीक्षा उत्तीर्ण झाला होता आणि त्याला वकील व्हायचे होते. त्यांची इतर दोन मुले रामनाथ (३२) आणि अनिल (२८) गावात राहतात. गुरुवारी पहाटे रामनाथ हा दूध काढून गावातील घरी निघून गेला. त्यानंतर सासुरवाडीहून घरी परतत असताना अनिल हा शेतघरात डोकावला. तेव्हा ही भीषण हत्या उघडकीस आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी जाऊन तपास सुरू केला आहे. चोरीच्या उद्देशाने दरोडेखोरांनी ही हत्या केल्याचा प्राथमिक तर्क असून घरातून एक लाख रुपये चोरीला गेल्याचाही अंदाज आहे. मात्र कौटुंबिक कलहाच्या दिशेनेही तपास सुरू आहे, असे पोलीस उपायुक्त सुनील भारद्वाज यांनी सांगितले. महिलेची दोन नातवंडांसह निर्घृण हत्या प्रतिनिधी, मुंबई मालवणीत न्यू कलेक्टर कॉलनीमध्ये बबली शॉ (वय ४७) आणि आर्यन (१३) व सानिया (८) या त्यांच्या नातवंडांची बुधवारी रात्री अत्यंत निर्घृण हत्या झाल्याने खळबळ उडाली आहे. ओळखीच्या व्यक्तीनेच हत्या केल्याचा प्राथमिक तर्क आहे. हत्येत वापरलेला चाकूही पोलिसांनी हस्तगत केला असून सातजणांना ताब्यात घेतले आहे. बबली मूळच्या पश्चिम बंगालच्या असून तुलसी या त्यांच्या मुलीने इस्माईल शेख याच्याशी विवाह केला होता. मात्र लग्नानंतर काही काळाने दोघे विभक्त झाल्यानंतर तुलसी ही आईसह राहात होती. पाच वर्षांपूर्वी तिचाही मृत्यू झाला तेव्हापासून बबली नातवंडांचा सांभाळ करीत होत्या. बबली यांनी आपल्या घराचा वरचा मजला भाडय़ाने दिला होता. त्यावर त्यांची गुजराण होत होती. दररोज पहाटे पाणी भरण्यासाठी येणाऱ्या बबली आल्या नाहीत तेव्हा शेजाऱ्यांनी त्यांच्या घराचे दार ठोठावले. आतून काहीही प्रतिसाद आला नाही तेव्हा जवळच राहाणाऱ्या त्यांच्या भाच्याला बोलावले गेले. तरीही काही उपयोग झाला नाही तेव्हा घराचे दार तोडून आत पाहिले असता बबली आणि आर्यन जमिनीवर तर सानिया पलंगावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेले दिसले. हादरलेल्या शेजाऱ्यांनी पोलिसांना पाचारण केले.