इचलकरंजी येथील चंदूर ओढय़ावरील पुलावर मंगळवारी पाणी जाण्यासाठी असलेला नळ फुटून त्यामध्ये वाळूचा ट्रक अडकल्याने या मार्गावरील वाहतूक सुमारे पाच तासांहून अधिक काळ खोळंबली होती. या पुलाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असून तात्पुरता बनवलेला पर्यायी रस्ताही निकृष्ट दर्जाचा आहे. इचलकरंजी ते चंदूर या गावांना जोडणारा कलानगरनजीक ओढय़ावर असलेला पूल अत्यंत छोटा असल्याने प्रत्येक वर्षी पावसाळय़ात हा पूल पाण्याखाली जातो. त्यामुळे पाणी ओसरण्याची प्रतीक्षा करीत दोन्ही बाजूकडे वाहनांच्या रांगा लागत. त्यामुळे या ठिकाणी नवीन उंच पूल बांधण्यात यावा अशी मागणी भागातील नागरिकांतून वारंवार केली जात होती. गतवर्षी या ठिकाणी आमदार सुरेश हाळवणकर यांच्या प्रयत्नातून पूल मंजूर झाला. त्याच्या कामाचा नारळही फोडला गेला. पण काम मात्र सुरू झाले नव्हते. आता ऐन पावसाळय़ाच्या सुरुवातीलाच या पुलाचे काम हाती घेण्यात आले आहे. तर पावसाळय़ात काम सुरू केल्याने मोठा पाऊस झाल्यास ओढय़ाच्या पाण्यात हा पूल वाहून जाण्याची भीती नागरिकांतून व्यक्त होत आहे. पुलाचे काम सुरू झाल्याने या मार्गावरील वाहतुकीसाठी पर्यायी रस्ता करण्यात आला आहे. हा पर्यायी रस्ता अत्यंत निकृष्ट असल्याची तक्रार वाहनधारकांतून केली जात आहे. त्याचा प्रत्यय आजच्या घटनेने आला. एमएच ०९ एक्यू ९००२ क्रमांकाचा वाळूने भरलेला ट्रक या रस्त्यावरून जात असताना या अरुंद पुलावर अडकला. पाणी वाहून जाण्यासाठी बसवलेला नळ फुटल्याने ट्रकची मागील बाजूची दोन्ही चाके त्यामध्ये अडकली. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा चांगलाच खोळंबा झाला. सुमारे पाच तास हा ट्रक अडकून पडला होता. या मार्गावर चंदूरसह शाहूनगर, साईनगर, आभारफाटा, दावतनगर, सहारानगर, सनदी मळा आणि रुई भागातील नागरिकांची ये-जा सुरू असते. या भागात कारखाने व उद्योग असल्याने मार्गावर वाहनांची वर्दळही सतत असते. पण अशा घटनांमुळे सर्वानाच नाहक त्रास सहन करावा लागत आहे. म्हणूनच लोकप्रतिनिधींनी या प्रश्नी लक्ष घालून सुधारणा घडवून आणावी अशी मागणी करण्यात येत आहे.