सध्या सगळ्या निर्मात्यांच्या तोंडी आलिया भट्टचेच नाव आहे. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनमध्ये नव्या फळीच्या कलाकारांत आलियानेच जास्त काम केले आहे. लवकरच ती अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ड्रॅगन' सिनेमात दिसणार आहे. याशिवाय ती इतर सिनेमांच्या संहिताही वाचते आहे. 'डीएनए' वृत्तसंस्थेने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार, फिल्ममेकर मेघना गुलझारनेही तिच्या आगामी सिनेमासाठी आलियाला विचारले आहे. हरिंदर सिक्का यांच्या 'कॉलिंग सेहमत' या पुस्तकावर हा सिनेमा आधारित असणार आहे. ८० चं दशक दाखवण्यात येणाऱ्या या सिनेमात, १९७१ मध्ये झालेल्या भारत- पाकिस्तानच्या युद्धावर सिनेमाचे कथानक बेतलेले असणार आहे. यात आलिया एका काश्मिरी मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. एक काश्मिरी मुलगी असते पण तिचं लग्न एका पाकिस्तानी सेना अधिकाऱ्याशी होते. त्यामुळे एका पत्नीचे कर्तव्य आणि भारताची नागरिक या दोन गोष्टींमध्ये ती अडकते. नक्की कोणत्या भूमिकेला न्याय द्यावा अशा द्विधा मनःस्थितीत ती अडकलेली असते. हा सिनेमा भारत- पाकिस्तानच्या युद्धा पार्श्वभूमीवर बनत असला तरी यात युद्धजन्य परिस्थिती दाखवण्यात येणार नाही. 'बॉलिवूड हंगामा'ने दिलेल्या वृत्तानुसार, सुरूवातीला आलिया हा सिनेमा करायला तयार नव्हती. पण जेव्हा करण जोहर या सिनेमाची 'जंगली पिक्चर्स'सोबत निर्मिती करणार हे कळले तेव्हा तिने या संहितेचा पुनर्विचार केला. आलियाने आतापर्यंत करणसोबत २०१२ मध्ये आलेल्या 'स्टुण्डट ऑफ दि इअर', गौरी शिंदेच्या 'डिअर झिंदगी', अभिषेक वर्माच्या '२ स्टेट्स', शशांक खेतान दिग्दर्शित 'बद्रीनाथ की दुल्हनिया' आणि 'हम्टी शर्मा की दुल्हनिया', शकुन बत्रा दिग्दर्शित 'कपूर अॅण्ड सन्स' या सिनेमांत काम केले आहे. त्यामुळे मेघना गुलझारच्या या सिनेमात करणने स्वारस्य दाखवल्यावर आलिया नाही म्हणू शकली नाही.