निर्माता-दिग्दर्शक करण जोहर आणि त्याचा मित्रपरिवारा याविषयी अनेक जण जाणून आहेत. बी टाऊनमध्ये येणाऱ्या नवोदित कलाकारांपासून ते अनेक वर्षे चित्रपटसृष्टीत काम केलेल्या दिग्गज कलाकारांपर्यंत सर्वजण करणच्या फ्रेंडलिस्टमध्ये सहभागी आहेत. पण, करणच्या याच मित्रमंडळींच्या यादीतील त्याच्या एका चांगल्या सेलिब्रिटी मैत्रीणीसोबत बिनसले आहे. करण जोहर आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्यात ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटापासूनच वादाची ठिणगी पडली आहे. सूत्रांच्या सांगण्यानुसार सध्या हे दोघंही त्यांच्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये ऑल इज नॉट वेल अशीच काहीशी परिस्थिती असल्याचे म्हटले जात आहे.

‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाच्या प्रसिद्धीदरम्यान अभिनेत्री अनुष्का शर्मा त्याच्या इतर चित्रपटांच्या कामांमध्ये व्यग्र होती त्यामुळे ती सर्वच ठिकाणी चित्रपटाच्या टीमसोबत जाऊ शकली नाही. पण, तरीही चित्रपटाची प्रसिद्धी सुरुच होती. याच प्रसिद्धीदरम्यान करण अनुष्काशिवाय ऐश्वर्याला एकटीलाच चित्रपटाची प्रसिद्धी करु देत नव्हता. ऐश्वर्याच्या एकटीच्याच उपस्थितीमुळे प्रेक्षकांना फक्त तिच या चित्रपटातील मुख्य अभिनेत्री आहे असे वाटू नये, यासाठी करण अॅशला एकटीला चित्रपटाचे प्रमोशन करु देत नव्हता. करणच्या या निर्णयामुळे ऐश्वर्या चांगलीच दुखावली गेली होती.

चित्रपटाच्या प्रदर्शनाला आज इतके महिने उलटूनही करण आणि ऐश्वर्याचे नाते पूर्वपदावर आलेले नाही. बॉलिवूड लाइफने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार ‘ऐ दिल है…’ नंतर करणने आणखी एका चित्रपटासाठी अॅशला विचारले होते पण, काही कारणं देत तिने हा चित्रपट नाकारला. त्यांच्या याच वादाचा प्रत्यय तेव्हा आला जेव्हा ऐश्वर्याच्या वडिलांचे निधन झाल्यानंतर त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी बॉलिवूडच्या बऱ्याच कलाकारांनी हजेरी लावली होती. पण, या कलाकारांच्या गर्दीत करण जोहर मात्र कुठेच दिसला नाही. त्यामुळे चित्रपट वर्तुळात या दोघांच्याही वादाची चर्चा रंगू लागली आहे.