'कसे आहात सगळे, हसताय ना. हसायलाच पाहिजे', असं म्हणत प्रेक्षकांची मोठ्या आपुलकीने विचारपूस करत निलेश साबळे सर्वांच्या भेटीला येतो. मराठी कलाविश्वात त्याचं नाव सध्या बरंच चर्चेत असतं. डॉक्टर पासून विनोदी कार्यक्रमाचा सूत्रसंचालक आणि दिग्दर्शक असा निलेशचा प्रवास फारच रंजक आहे. कोल्हापूर ते मुंबई अशा त्याच्या कारकिर्दीत बरेच चढउतार आले. या चढ- उतारांमध्ये त्याला साथ मिळाली ती म्हणजे त्याच्या पत्नीची. २०१० मध्ये निलेश साबळे विवाहबद्ध झाल्याचं कळतं. तेव्हापासूनच पत्नीची म्हणजेच गौरी साबळेची त्याला साथ मिळाली. निलेश आणि गौरी दोघंही सोशल मीडियावर फारसे सक्रिय नाहीत. पण, तरीही चाहत्यांनी त्यांच्याविषयीची बरीच माहिती सोशल मीडियावर पोस्ट केल्याचं पाहायला मिळालं आहे. अशाच माहितीमध्ये निलेशच्या लग्नाचे फोटोसुद्धा सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहेत. त्याच्या लग्नाचे फोटो आणि त्या फोटोंचे काही व्हिडिओ बऱ्याच युजर्सनी पोस्ट केले आहेत. वाचा : अबब! इतक्या संपत्तीच्या मालकीण आहेत रेखा वाचा : . म्हणून स्मिता पाटील अन्नू कपूर यांना सोडायला थेट विमानतळापर्यंत गेल्या होत्या निलेशच्या कारकिर्दीच्या चढत्या आलेखावर नजर टाकली असता अनेकांनाच त्याचा हेवा वाटतो. आयुर्वेदाची एम. एस ही पदवी घेतल्यानंतर कोल्हापूर नजीकच्या एका गावातून निलेश एका कार्यक्रमात भाग घेण्यासाठी थेट मुंबईला आला होता. 'महाराष्ट्राचा सुपरस्टार' या कार्यक्रमातून नावारुपास आल्यावर त्याने 'फू बाई फू' या कार्यक्रमातूनही प्रेक्षकांची मनं जिंकली. यशाची एक- एक पायरी चढत आता तो 'चला हवा येऊ द्या' या प्रसिद्ध विनोदी कार्यक्रमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळत आहे. दिग्दर्शनासोबतच त्याने या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची जबाबदारीसुद्धा लिलया पेलली असल्यामुळे कलाविश्वात अनेकांनाच त्याचं कौतुक वाटतं. सध्याच्या घडीला निलेशच्या दिग्दर्शनातील हा कार्यक्रम महाराष्ट्रातीलच नाही तर, जगभरातील प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. फक्त मराठी कलाविश्वापुरताच मर्यादीत न राहता या कार्यक्रमाच्या कक्षा बऱ्याच रुंदावल्या आहेत. मराठीसोबतच हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे कलाकारही या कार्यक्रमात हजेरी लावतात. टीआरपीच्या बाबतीतही हा कार्यक्रम बऱ्याच मालिकांना चांगलीच टक्कर देत आहे.