विनोदवीर कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवरमधील वाद अधिक चिघळत चालला आहे. मात्र, याचा फटका लाखो प्रेक्षकांच्या आवडत्या ‘द कपिल शर्मा शो’ ला पडत असल्याचे दिसतंय. गेल्या शनिवारी कपिल-सुनीलमधील वाद समोर आला. त्यानंतर सुनील, चंदन प्रभाकर, अली असगर आणि सुगंधा मिश्रा यांनी सोमवारपासून शूटींगसाठी हजेरी लावलेली नाही.

सुनील, चंदन प्रभाकर आणि अली असगर हे शूटींगसाठी अनुपस्थि राहिल्याने त्यांच्या जागी राजू श्रीवास्तव, एहसान कुरेशी आणि सुनील पाल यांना शेवटच्या क्षणी बोलवण्यात आले. यावेळी ‘नाम शबाना’ चित्रपटाची टीम प्रसिद्धीसाठी या शोवर येणार होती. सोमवारी कपिलने राजू, एहसान आणि सुनीलच्या साथीने ‘नाम शबाना’ टीमसोबत शूट केले. पण, बुधवारच्या शूटसाठी सेलिब्रिटी पाहुणे तर आलेच नाहीत. त्यासोबत विनोदवीरांनीही शोकडे पाठ फिरवल्याचे वृत्त ‘स्पॉटबॉय’ या संकेतस्थळाने दिले आहे. शोच्या सेटवर केवळ किकू शारदा आणि रोशेल हे शूट करण्यासाठी आले होते. मात्र, केवळ या दोघांसोबत कसं शूट करणार? या विचाराने स्वतः कपिल शर्मानेच शूटींग रद्द केले.

दरम्यान, कपिलवर आता जणू काही आभाळच कोसळल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याने ‘फिरंगी’ या चित्रपटाच्या कामासाठी सोनी वाहिनीकडे काही दिवसांची सुटी मागितली होती. त्यावर अपेक्षित भागांचे शूटींग पूर्ण करून सुटी घेण्याची परवानगी वाहिनीकडून देण्यात आली होती. पण, आता सहकलाकाराच नसल्यामुळे शूटींग करणार तरी कसे? असा प्रश्न कपिलसमोर उभा राहिला आहे.दरम्यान, सुनीलने या शोमध्ये परत न जाता स्वतःचा शो सुरु करावा असे त्याच्या चाहत्यांचे म्हणणे आहे. पण, ‘द कपिल शर्मा शो’ सोडायचा की नाही याचा निर्णय अद्याप सुनीलने घेतलेला नाही.