दिग्दर्शक आनंद एल राय याच्या ‘कतरिना मेरी जान’ चित्रपटाची चर्चा गेल्या काही दिवसांपासून ऐकायला मिळत आहेत. यामध्ये शाहरुख खान, कतरिना कैफ आणि अनुष्का शर्मा यांच्या भूमिका आहेत. मात्र कॅटने दिग्दर्शकांकडे चित्रपटाचं नाव बदलण्याची मागणी केल्याची माहिती समोर येतेय.

यासंदर्भात ‘डीएनए’ या वृत्तपत्राशी बोलताना कतरिना म्हणाली की, ‘चित्रपटाचं नाव जरी ‘कतरिना मेरी जान’ असलं तरी मी स्वत:चीच भूमिका यामध्ये साकारत नाहीये. चित्रपटात मी कतरिना कैफ नाहीये. माझ्या भूमिकेचं नाव दुसरं आहे.’ या चित्रपटाची पटकथा आणि कतरिनाच्या आयुष्यामध्ये बरंच साधर्म्य असल्याची सूत्रांची माहिती आहे. आपल्या खासगी आयुष्याबद्दल सार्वजनिकरित्या चर्चा केल्याचं कॅटला कधीच आवडत नाही. त्यामुळेच कदाचित तिने नाव बदलण्याची मागणी केली असावी असंही म्हटलं जातंय.

‘चित्रपटात कतरिना तिचीच भूमिका साकारणार असून शाहरुख खान तिच्या चाहत्याच्या भूमिकेत दिसणार आहे. यानुसारच पटकथालेखन करण्यात आलं. आपल्या आयुष्यावरच चित्रपट बेतलेला आहे असं लोकांना वाटू नये म्हणूनच तिने नाव बदलण्यास सांगितलं,’ अशी सूत्रांची माहिती आहे.

वाचा : प्रदर्शनाच्या आदल्या दिवशीच ‘बाबूमोशाय बंदूकबाज’ लीक

पटकथेत कतरिनाचं ब्रेकअप झाल्याचंही दाखवण्यात आल्याची माहितीही सूत्रांनी दिली. काही महिन्यांपूर्वीच कतरिना आणि रणबीरचा ब्रेकअप झाला. आपल्या रिअल आणि रिल लाइफची तुलना चित्रपटात होऊ नये अशीच कॅटची अपेक्षा आहे. तिचा हा मुद्दा लक्षात घेऊन दिग्दर्शकांनीही चित्रपटाचं नाव बदलण्याची तयारी दाखवली आहे.