विनोदवीर कपिल शर्मा आणि कृष्णा अभिषेक यांच्यात असलेले वैर अनेक प्रेक्षकांना ठाऊकच आहे. या दोन प्रतिस्पर्धी कलाकारांची विनोदाची शैली वेगळी, कार्यक्रमाचे स्वरुपही तितकेच वेगळे. कपिलच्या ‘कॉमेडी नाइट्स’ची कलर्स वाहिनीवरुन गच्छंती केल्यानंतर कृष्णा अभिषेक आणि त्याच्या टीमने रसिकांना हसवण्याची जबाबदारी घेतली होती. पण कपिलच्या कार्यक्रमाप्रमाणे टीआरपी मिळवण्यात मात्र कृष्णाचा शो अपयशी ठरला हेच खरे. या दोन्ही कलाकारांमध्ये असणारे वादविवाद टेलिव्हिजन विश्वात चर्चेचा विषय ठरत होते. त्यामुळे या दोन्ही कलाकारांमध्ये असणारे वाद मिटणार कधी हाच प्रश्न अनेकांना पडत होता.

कार्यक्रमाचा टीआरपी, स्वाभिमान, कलाकारांचा कल या सर्व विषयांमुळे कपिल आणि कृष्णा यांच्यात वाद निर्माण झाल्याचे म्हटले जात होते. पण, ‘डिएनए’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार आता खुद्द कृष्णा अभिषेकनेच या प्रकरणातील काही गोष्टींवरुन पडदा उचलला आहे. कपिल शर्मा आणि कृष्णा अभिषेक यांना एकाच कार्यक्रमात पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार का? असा प्रश्न कृष्णा अभिषेकला विचारला असता, कृष्णाने दिलेल्या उत्तराने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या प्रश्नाचे उत्तर देताना कृष्णा म्हणाला, ‘हो नक्कीच. एकाच कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रेक्षक आमच्या एकत्र येण्याची वाटच पाहात असतील. माझ्यामते हे म्हणजे सलमान आणि शाहरुखने एकाच चित्रपटात काम करण्यासारखीच ही परिस्थिती आहे. जर का असे झाले तर फारच मजा येईल हे नक्की. आणि ती वेळ लवकरच येईल’. कृष्णाच्या या वक्तव्यामुळे प्रेक्षकांमध्ये सध्या उत्सुकतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.

‘पीटीआय’शी बोलताना कृष्णाने कपिल शर्माची स्तुती करत त्याच्यासोबत काम करण्याची इच्छाही व्यक्त केली. दरम्यान, बऱ्याच दिवसांपूर्वी कलर्स वाहिनीसोबत चाललेल्या काही वादांमुळे कपिलचे बस्तान सोनी वाहिनीवर बसले होते. ‘द कपिल शर्मा शो’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून विनोदवीर कपिल शर्मा आणि त्याची अतरंगी टीम प्रेक्षकांच्या मनावर पुन्हा एकदा राज्य करु लागली. कपिलच्या कार्यक्रमाच्या तुलनेत कृष्णा अभिषेकच्या कार्यक्रमाने त्यांच्या विवादास्पद विनोदी शैलीमुळे अनेक कलाकारांचाही रोष ओढवून घेतला होता.