करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग आता मोकळ्या झाल्या आहेत. अभिनेता रणबीर कपूर, ऐश्वर्या राय बच्चन आणि अनुष्का शर्मा यांच्या मुख्य भूमिका असणाऱ्या या चित्रपटामध्ये रॉकस्टार रणबीर आणि ऐश्वर्या राय यांच्यातील केमिस्ट्री पाहण्याजोगी असणार आहे. चित्रपटाच्या ट्रेलरमध्येही अॅश आणि रणबीरची केमिस्ट्री पाहायला मिळाली होती.

रणबीरसोबतच्या केमिस्ट्रीबद्दल ऐश्वर्याला विचारले असता तिने यावर तिची प्रतिक्रिया दिली आहे. ‘हे सर्व माझ्या आणि चित्रपटाच्या दिग्दर्शकांमध्ये असलेल्या सहजतेमुळे शक्य झाले. एका चित्रपटाचा प्रवास कोणत्या रोखाने झाला पाहिजे हे आम्ही जाणतो. त्यामुळे त्याच काळजी करण्याचं काहीच कारण नव्हतं. मी माझ्या भूमिकेला चांगलंच समजून घेतलं होतं. इतकी वर्षे एकत्र काम केल्यामुळे आमच्या नात्यात सहजता आली आहे’, असे ऐश्वर्या म्हणाली. या भूमिकेसाठी विचारले असता ऐश्वर्याने दिग्दर्शकांना अनेक प्रश्न विचारत होते असेही स्पष्ट केले. ‘मी त्या भूमिकेसाठी आता काम केले आहे. पण त्या भूमिकेची पार्श्वभूमी पाहता आमच्यातील ‘ती’ दृश्ये मुद्दाम चित्रित केलेली नाहीत’, असे ऐश्वर्या म्हणाली. करणनेही ऐश्वर्याने साकारलेल्या भूमिकेची प्रशंसा केली आहे. ‘तिने तिची भूमिका नीट समजून घेत हे पात्र पडद्यावर उतरवले आहे’, असे करण म्हणाला.

‘ती एक कवयित्री आहे. ती तिच्या मनाला आणि बुद्धीला चांगलीच ओळखते. आम्ही चित्रपटाच्या कथानकासोबत पूर्ण न्याय करण्याचा प्रयत्न केला आहे’, असेही करण ऐश्वर्याच्या भूमिकेविषयी म्हणाला. करण आणि ऐश्वर्याने ‘ऐ दिल है मुश्किल’मधील रणबीर आणि ऐश्वर्याच्या काही दृश्यांवर दिलेल्या स्पष्टीकरणामुळे सध्या चाहत्यांमध्ये अॅश आणि रणबीरची ऑनस्क्रिन केमिस्ट्री पाहण्यासाठीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. अनेक अडचणींचा सामना केल्यानंतर करण जोहर दिग्दर्शित ‘ऐ दिल है मुश्किल’ हा चित्रपट २८ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार.