‘ये हैं मोहब्बतें’ मालिकेतील अभिनेत्री श्रुती बापना लवकरच ही मालिका सोडणार आहे. श्रुती या मालिकेत वंदिता बाला चंद्रनची व्यक्तिरेखा साकारत आहे. मालिकेत तिच्या व्यक्तिरेखेचा अपघात होतो, यातूनच तिच्या व्यक्तिरेखेला पूर्णविराम देण्यात येणार आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वंदिताचा अपघात रमण भल्लाच्या गाडीने होतो आणि इशिता म्हणजे दिव्यांका त्रिपाठी या घटनेची साक्षीदार असणार आहे. या सीननंतर श्रुती या मालिकेला कायमचा रामराम ठोकणार आहे. या टीव्ही अभिनेत्रीला अधिकाधिक लोक इशिताची बहिण वंदू या नावानेच ओळखतात. गेल्या तीन वर्षांपासून जे प्रेक्षक ही मालिका पाहत आहेत ते श्रुतीला नक्कीच मिस करतील.

या मालिकेतील तिचा नवरा बालासोबतची तिची केमिस्ट्री लोकांना फार आवडली होती. श्रुतीला सध्या या मालिकेत काम करायला आधीसारखी मजा येत नाहीये म्हणून तिने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला. श्रुतीला आता नवे काही तरी करण्याची इच्छा आहे. ‘एबीपी’ला दिलेल्या मुलाखतीत श्रुती म्हणाली की, ‘ही तीन वर्षे खरंच खूप चांगली होती, अनेक चांगल्या आठवणी मी माझ्यासोबत घेऊन जात आहे. पण आता मला काही तरी नवे करायचे आहे.’

श्रुती म्हणाली की, ती थोडे दिवस आराम करेल आणि मग परत कामावर रुजू होईल. जरी तिने ही मालिका सोडली तरी या मालिकेतील कलाकारांसोबतची तिची मैत्री आयुष्यभर राहणार आहे. श्रुतीने सांगितले की, ती सर्वात जास्त नीना कुलकर्णी यांच्याजवळ होती.
श्रुतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर ऑन स्क्रिन कुटुंबाचे काही फोटो कोलाज केले आहेत. हा फोटो शेअर करताना तिने लिहिले की, ‘तीन वर्षे ‘ये हैं मोहब्बतें’ मालिकेवर प्रेम करणाऱ्या सर्व प्रेक्षकांचे मनःपूर्वक आभार.’

https://www.instagram.com/p/BR5Svauh7yr/

https://www.instagram.com/p/BR3fdHjB-Q0/