चाळीस वर्षे केवळ लोकाश्रयावर चाललेली ‘चतुरंग’ प्रतिष्ठान ही आता संस्था राहिली नसून, तिचे विद्यापीठ झाले आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नाटय़ दिग्दर्शक व राष्ट्रीय नाटय़ विद्यालयाचे (एनएसडी) संचालक प्रा. वामन केंद्रे यांनी शनिवारी येथे केले. चतुरंग प्रतिष्ठानतर्फे चोविसावे रंगसंमेलन डोंबिवलीतील स. वा. जोशी शाळेच्या मैदानात आयोजित केले आहे. उद्घाटनाच्या कार्यक्रमाला ज्येष्ठ नाटय़ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, विजय केंकरे, मंगेश कदम, अजित भुरे उपस्थित होते. देशात महत्त्वाच्या असलेल्या पाच संस्थांमध्ये चतुरंग ही एक अशी संस्था आहे जी लोकाश्रयावर जिवंत आहे. तळागाळातील रसिक या संस्थेने जोडला आहे. खूप काम करणारी ही देशातील एकमेव संस्था आहे. श्रद्धावानांचा जसा कुंभमेळा आहे तसे कलावंत, रसिकांसाठी चतुरंगचे रंगसंमेलन म्हणजे रसिकतेचा, अभिव्यक्ती आणि रसास्वादाचा एक सोहळा आहे. पोटतिडिकीने काम करणारे कार्यकर्ते या संस्थेत असल्याने ही संस्था आता विद्यापीठांचे विद्यापीठ झाले आहे, असे प्रा. वामन केंद्रे म्हणाले.चार माणसांनी स्थापन केलेल्या या संस्थेने आतापर्यंत चार लाख रसिकांशी नाळ जोडली आहे. डबेवाल्यांच्या व्यवस्थापनाचा अभ्यास परदेशात शिकवला जातो. त्याचप्रमाणे चतुरंगसारख्या संस्थांच्या व्यवस्थापनाचा शिक्षणात अभ्यासक्रम झाला पाहिजे. यासाठी ‘एनएसडी’मध्ये ‘आर्ट ऑफ अॅडमिनिस्ट्रेशन मॅनेजमेंट मार्केटिंग’चा अभ्यास सुरू करण्यासाठी प्रयत्न करू. अशा अभ्यासक्रमांची आता गरज आहे, असे केंद्रे म्हणाले. अलीकडे दोन कोटी खिशात असल्याशिवाय संमेलने साजरी होत नाहीत. अशा परिस्थितीत शासकीय अनुदान न घेता केवळ लोकवर्गणीतून साजरे होणारे हे देशातील एकमेव संमेलन आहे. म्हणून या संमेलनाचे महत्त्व खूप आहे. समाजातील प्रत्येक घटकावर या संस्थेचे बारकाईने लक्ष असल्यामुळे नाटय़ दिग्दर्शक रत्नाकर मतकरी जीवन गौरव पुरस्कारासाठी या संस्थेच्या नजरेतून सुटले नाहीत. विद्वानांचा तांडा असलेल्या या संस्थेने आपले कार्य राष्ट्रपातळीवर न्यावे. मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानात सहभागी होण्यासाठी पाच सांस्कृतिक संस्थांची निवड झाली, तर त्यामध्ये चतुरंग अग्रभागी असेल, असा विश्वास केंद्रे यांनी व्यक्त केला.