प्रचारातून परतणाऱ्या दोन भाजप कार्यकर्त्यांवर अज्ञात इसमाने एअरगनने गोळीबार केला. या हल्ल्यात या दोघांना किरकोळ दुखापत झाली. पवई पोलिसांनी याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.  मंगळवारी प्रचाराचा शेवटचा होता. भाजपचे काही कार्यकर्ते किरीट सोमय्या यांच्या प्रचारावरून परतत होते. पवई येथील आयआयटीसमोर दुपारी पावणेदोनच्या सुमारास रिक्षात असलेल्या सुभाष गुप्ता (३६) यांच्या डोक्याला गोळी चाटून गेली. त्यांनी रिक्षा थांबवली आणि शोध घेतला पण आसपास कुणीच नव्हते. त्यावेळी दुसऱ्या रिक्षात असणाऱ्या संजय बर्वे (४६) यांनाही गोळी लागली. या गोळीबाराचा मोठा आवाज झाल्याने घबराट पसरली होती. या दोघांनी पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले. एअरगनने हा गोळीबार केला असलण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. आम्ही अनोळखी व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू असल्याचे पवई पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यादवराव जाधव यांनी सांगितले.