लोकसत्ताच्या बदलता महाराष्ट्रउपक्रमात ऊर्जा क्षेत्रावर परिसंवाद

अन्न, वस्त्र, निवारा या गरजांइतकीच ऊर्जा ही महत्त्वाची गरज. आपल्या संपूर्ण जगण्याला व्यापून टाकणाऱ्या या ऊर्जा क्षेत्राची सद्य:स्थिती, त्याचा अपेक्षित विकास, या क्षेत्राच्या विकासमार्गावरील आव्हाने आणि अडचणी यांचा लेखाजोखा ‘लोकसत्ता बदलता महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत २६ व २७ जून रोजी मांडण्यात येणार आहे. या उपक्रमातील नव्या पर्वात ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ, अभ्यासक ‘ऊर्जेची प्रकाशवाट’ दाखविणार आहेत.

केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांच्या हस्ते या परिसंवाद कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून, केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत त्याचा समारोप होईल. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे या क्षेत्राबाबत मार्गदर्शन करतील. ‘लोकसत्ता’च्या ‘बदलता महाराष्ट्र’ उपक्रमात राज्याशी संबंधित विविध विषयांचा वेध घेतला जातो. त्या त्या क्षेत्रातील आव्हाने, अडचणी आदींबाबत तज्ज्ञ, अभ्यासक आणि राजकीय मंडळींची मते जाणून घेऊन ती धोरणकर्त्यांपर्यंत पोहोचविणे हा या उपक्रमाचा हेतू आहे.

त्यानुसार आतापर्यंत या उपक्रमात शेती, उद्योग, पर्यावरण, महिलांचे प्रश्न अशा विषयांवर परिसंवाद घेण्यात आले. त्यातील नवे पर्व ‘ऊर्जा’ या विषयावर आधारित आहे. येत्या २६ व २७ जून रोजी प्रत्येकी तीन परिसंवाद होतील.

दिवस पहिला

पहिल्या दिवशी ‘ऊर्जा क्षेत्राची सद्य:स्थिती व आव्हाने’ यांचा मागोवा घेतला जाईल. ‘प्रयास’चे अध्यक्ष शंतनू दीक्षित, राज्य वीज ग्राहक संघटनेचे अध्यक्ष प्रताप होगाडे, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार हे त्यात सहभागी होतील. वीज क्षेत्राच्या नियमनाबाबत ‘इंडियन एनर्जी एक्स्चेंज’चे माजी व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत देव, ‘सीआयआय’च्या पश्चिम विभागाचे अध्यक्ष निनाद करपे, माजी ऊर्जामंत्री दिलीप वळसे-पाटील हे ऊहापोह करतील, तर पर्यायी ऊर्जास्रोतांच्या विकासवाटांबाबत जैन इरिगेशन्सचे ए बी जैन, अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ गजानन जोशी, पॉवर बॅकअप व अपारंपरिक ऊर्जा क्षेत्रातील तज्ज्ञ शैलेश संसारे मार्गदर्शन करतील.