खराब कामामुळे २० वर्षांतच पुनर्बाधणीची वेळ; केंद्राच्या यंत्रणेकडून पुनर्बाधणी ब्रिटिशांच्या काळात बांधलेल्या अनेक इमारती १५० वर्षांनंतर चांगल्या टिकल्या असताना, अवघ्या २० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या नरिमन पॉईंट परिसरातील ‘मनोरा’ या आमदार निवासाच्या इमारती खराब कामाच्या दर्जामुळे पाडून पुन्हा बांधण्याची वेळ आली आहे. १५ मजली चारही इमारती पाडून त्यांची पुनर्बांधणी करण्याचे सरकारने ठरविले आहे. नरिमन पॉईंट परिसरात समुद्रकिनारी ‘मनोरा’ आमदार निवासाच्या चार इमारती १९९६ मध्ये बांधून पूर्ण झाल्या. तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या हस्ते या इमारतींचे उद्घाटन झाले होते. अवघ्या २० वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या या इमारतींचे अंतर्गत बांधकाम सध्या खराब झाले आहे. सदनिकांमधील छताचे प्लॅस्टर कोसळत असून, काही ठिकाणी भिंतींचे आवरण उखडले गेले आहे. गेली दोन वर्षे सातत्याने बांधकामाच्या दर्जाबाबत आमदारांकडून तक्रारी करण्यात येत आहे. या पाश्र्वभूमीवर विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत ‘मनोरा’ इमारतीचे एकूणच अंतर्गत बांधकाम खराब झाल्याने या चारही इमारती पाडून पुनर्बाधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अलीकडेच ‘मनोरा’चे ‘स्ट्रक्चरल ऑडिट’ करण्यात आले. या पाहणीतही इमारती केव्हाही धोकादायक होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. पुनर्बांधणीच योग्य -बागडे ‘मनोरा’ आमदार निवासाच्या कामाच्या दर्जावरून अनेक दिवस तक्रारी येत आहेत. या इमारती राहण्यास योग्य नाहीत, असे सार्वजनिक बांधकाम खात्याचेही मत झाले आहे. यामुळेच या इमारती पाडून नवीन बांधण्यात येतील, असे विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी स्पष्ट केले. ‘मॅजेस्टिक’ धोकादायक झाल्याने ती इमारत पाडण्यात येणार आहे. याबरोबरच ‘मनोरा’ही पाडाव्या लागतील. परिणामी आमदारांच्या निवासाचा प्रश्न उपस्थित होईल. यावर मार्ग म्हणून ‘मनोरा’च्या आवारात एक इमारत आधी बांधण्यात येईल. टप्प्याटप्प्याने इमारती पाडून त्यांची पुनर्बांधणी करण्यात येणार आहे. पुनर्बांधणीचे काम केंद्र सरकारच्या यंत्रणेमार्फत केले जाणार असल्याची माहितीही बागडे यांनी दिली. एवढय़ा लवकर इमारतींची दुर्दशा कशी? छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्थानक, मुंबई महानगरपालिका किंवा फोर्ट परिसरात ब्रिटिशांच्या काळात बांधण्यात आलेल्या इमारती अजूनही चांगल्या अवस्थेत आहेत. अर्थातच इमारती जुन्या झाल्याने त्यांची डागडुजी करावी लागते. १९९० नंतर ‘मनोरा’च्या बांधकामास सुरुवात झाली. बहुधा कामाच्या दर्जाकडे तेव्हा लक्ष दिले गेले नाही वा २० वर्षांमध्ये इमारतींची देखभाल बरोबर न झाल्यानेच ही वेळ आली आहे. इमारती तेवढय़ा अतिधोकादायक झालेल्या नाहीत, पण त्यांच्या देखरेख व दुरुस्तीवर एवढा खर्च होतो की पाडून नव्या इमारती बांधल्यास त्याचा दर्जा तरी चांगला राहील, असे सांगण्यात आले. इमारतीच्या काही भागांचे बांधकाम पडत असल्याने चारही इमारतींना सध्या संरक्षक जाळ्या लावाव्या लागल्या आहेत. साधारणपणे इमारतींचे आयुष्यमान ७५ वर्षे गृहीत धरले जाते. पण समुद्रकिनारी असलेल्या ठिकाणी किंवा मुंबईत आयुष्यमान दहा वर्षे कमी अपेक्षित धरले जाते. ‘मनोरा’चे चारही टॉवर्स अवघ्या २० वर्षांमध्ये पाडावे लागत आहेत, ही बाब चिंताजनक आहे. -अनंत गाडगीळ, प्रसिद्ध वास्तुविशारद आणि आमदार