‘अकिला’ वृत्तपत्रातील ‘बातमी‘ समाजमाध्यमांमुळे आता चर्चेत
‘चलनातल्या ५००-१०००च्या नोटा रद्द होणार.. भ्रष्टाचार, काळा पैसा, नकली नोटा रोखण्यासाठी मोदी सरकारचा निर्णय..’ हा देशभरात बुधवारी प्रसिद्ध झालेल्या सर्वच वृत्तपत्रांचा मथळा होता, पण गुजरातमधल्या एका गुजराती वृत्तपत्राने ‘चलनमांथी ५००-१०००नी नोट नाबुत करवा निर्णय’ या मथळ्याखाली हे वृत्त तब्बल सात महिन्यांपूर्वी प्रसिद्ध केले होते. या नोटा ठरावीक तारखेपर्यंत जवळच्या बँकांमध्ये जमा करा, दर दिवशी फक्त दोन हजार रुपयांपर्यंतच पैसे बँकेत जमा करण्यास परवानगी आदी नरेंद्र मोदी यांनी मंगळवार, ८ नोव्हेंबर रोजी आपल्या भाषणात जाहीर केलेला सर्व तपशील जसाच्या तसा या वृत्तपत्राने प्रसिद्ध केलेल्या बातमी नमूद आहे. गुरुवारी या वृत्ताचे छायाचित्र समाजमाध्यमांवर पसरू लागल्यानंतर १ एप्रिल २०१६ रोजी प्रसिद्ध झालेले हे वृत्त म्हणजे लोकांना एप्रिल फूल करण्याचा भाग होता, असे या वृत्तपत्रातर्फे प्रसिद्ध करण्यात आले. मात्र या वृत्तातल्या तपशीलातील आणि सध्या घोषित झालेल्या निर्णयातील साम्य पाहता अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
सात महिन्यांपूर्वी संपूर्ण देशातील एकाही वृत्तपत्राला किंवा एकाही वृत्तवाहिनीला, देशातील मोठमोठय़ा पत्रकारांना, नोकरशहांना या वृत्ताबाबत काहीच माहिती नव्हती. सात महिन्यांनंतरही नरेंद्र मोदी यांनी हा निर्णय जाहीर करेपर्यंत देशातील फार कोणाला याबाबत माहिती नव्हती. मोदी यांनी याबाबत घोषणा केल्यानंतर गोंधळलेल्या देशवासीयांनी एटीएम यंत्रांकडे धाव घेतली. काहींनी रेल्वे तिकीट आरक्षण केंद्रे गाठत आपल्याकडील ५००-१०००च्या नोटांच्या बदल्यात १०० रुपयांच्या नोटा मिळतात का, यासाठी धावपळ सुरू केली. हा ज्वर ओसरेपर्यंत या वृत्ताचे छायाचित्र प्रसिद्ध होऊ लागले आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या.
पंतप्रधान गुजरातचे असल्याने त्यांच्या प्रदेशातील लोकांना ही बातमी आधी द्यावी, असे त्यांना वाटले का, असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला. गुजरातमध्ये या वर्तमानपत्राचे वाचक असलेल्या आणि काळा पैसा दडवून ठेवलेल्या लोकांना सात महिन्यांचा अवधी देण्यासाठी हा निर्णय घेतला का, असे अनेक तर्कवितर्क केले जाऊ लागले. अखेर ‘अकिला’ वृत्तपत्राकडून १ एप्रिल रोजी प्रसिद्ध झालेले वृत्त म्हणजे लोकांना ‘एप्रिल फूल’ करण्याचा प्रकार होता, असा खुलासा करण्यात आला. पण या वृत्तातील आणि प्रत्यक्ष निर्णयातील साधम्र्य लक्षात घेता पुढल्या वर्षीच्या १ एप्रिलचा ‘अकिला’चा अंक घेण्यासाठी झुंबड उडणार, यात शंका नाही.
वृत्त काय होते?
गुजरातमधील ‘अकिला’ या वृत्तपत्राने आपल्या १ एप्रिल २०१६च्या अंकात पान क्रमांक सातवर हे वृत्त प्रसिद्ध केले होते. ‘चलनातील ५००-१०००च्या नोटा रद्द करण्याचा निर्णय’, या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेल्या या वृत्तात या निर्णयाची साद्यंत माहिती होती. त्यात, काळा पैसा, भ्रष्टाचार, नकली नोटा आदी समस्यांचे निराकारण करण्यासाठी मोदी सरकारने हा निर्णय घेतल्याचे पहिल्या ओळीतच स्पष्ट केले आहे. त्याशिवाय ज्यांच्याकडे ५००-१०००च्या नोटा आहेत, त्यांनी ३० जूनच्या आधी त्या नोटा बँकेत देऊन १०० रुपयांच्या नोटा घ्याव्यात, असेही या वृत्तात सुचवण्यात आले होते.
तसेच २००० रुपयांच्या वरचे व्यवहार रोखीने न करता बँक, क्रेडिट-डेबिट कार्डच्या माध्यमातूनच करावेत, घरात भरमसाठ रोख रक्कम आढळल्यास कारवाईची शक्यता, अशा अनेक गोष्टींची माहिती या वृत्तपत्राने अगदी तपशीलवार दिली होती.