विनाकारण व विनंतीशिवाय केल्या गेलेल्या बदल्यांच्या विरोधात महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनकडून २८ जुलै रोजी आझाद मैदान येथे धरणे धरण्यात येणार आहे. बदल्यांचा निर्णय रद्द न झाल्यास बेमुदत संपाचा इशारा दिला आहे.
कामाच्या बदलणाऱ्या वेळा व रात्रपाळी करताना आधीच परिचारिकांच्या कुटुंबाची घडी बिघडलेली असताना विनाकारण आणि विनंतीशिवाय केलेली बदली यामुळे कुटुंब उध्वस्त होत आहेत. कामाचे वाढवलेले तास, देय सुट्टय़ा न देणे, सक्तीच्या बदल्या, रिक्त पदे याबाबत अनेकदा वैद्यकीय शिक्षण विभागाशी चर्चा करण्यात आली आहे. मात्र याबाबत प्रतिसाद मिळाला नसल्याने आंदोलनाचे हत्यार हाती घेण्यात आल्याचे संघटनेचे म्हणणे आहे.